Tuesday, December 25, 2018

अतिथि धर्माचे महत्व | Importance of Being Good Host




एखादा तपस्वी ब्राह्मण घरामध्ये आल्यानंतर जर त्याचा यथोचित आदरसत्कार झाला नाही तर गृहस्थाश्रमी पुरुषाला त्या ब्राह्मण अतिथीचे आशीर्वाद मिळण्याऐवजी उलट शापच मिळतात.  

ज्या गृहस्थाश्रमी पुरुषाच्या घरी ब्राह्मण अतिथी काहीही न खाता राहातो, त्या पुरुषाच्या सर्व कामना नष्ट होतात.  आशा म्हणजेच अज्ञात वस्तूच्या प्राप्तीची इच्छा आणि प्रतीक्षा म्हणजे ज्ञात वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होय.  सांगतं म्हणजे दृष्ट व अदृष्ट कामनांच्या अनुषंगाने मिळणारे फळ होय.  सूनृता म्हणजे प्रिय वाणीच्या निमित्ताने मिळणारे मानसन्मानादि फळ होय.  इष्ट म्हणजे यज्ञयागादि कर्मांच्यामधून मिळणारे फळ आणि पूर्त म्हणजे आरामादि म्हणजेच ऐहिक उत्कर्षामधून मिळणारे भौतिक फळ – ऐश्वर्य, अन्नधान्यादि सुबत्ता होय.  यानंतर पुत्र म्हणजे पुत्रपौत्रादि ही सुद्धा संपत्ति आहे.  पशू म्हणजेच स्थावरजंगमादि सुबत्ता होय.  

याप्रकारे ज्याच्या घरी अतिथिपूजन होत नाही, त्या पुरुषाची वर उद्धृत केलेली सर्व प्रकारची फळे नष्ट होतात.  तो मंदबुद्धीचाच पुरुष आहे.  म्हणून गृहस्थाश्रमी पुरुषाला आचारधर्म माहीत असणे अत्यंत आवश्यक आहेत.  तो मनुष्य आचार-विचार-उच्चाराने सुसंस्कारीत झाला पाहिजे.  कर्तव्य-अकर्तव्य, योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, विधि-निषेध याचे ज्ञान तर पाहिजेच; परंतु त्याप्रमाणे त्याने स्वतः प्रत्यक्ष त्या आचारसंहितेचे पालन सुद्धा केले पाहिजे.  

या आचारधर्मांचे पालन केले नाही तर प्रत्यवाय दोष निर्माण होऊन गृहस्थाश्रमी पुरुषाचे सर्व कामना, ऐश्वर्य नष्ट होईल.  म्हणून कोणत्याही प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये अतिथीची उपेक्षा करू नये.  अत्यंत दरिद्री, गरीब अवस्थेत देखील अतिथीचे यथाशक्ति स्वागत, आदरातिथ्य व पूजन करावे.


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011




- हरी ॐ



No comments:

Post a Comment