Tuesday, February 27, 2018

आचारसंहितेचे महत्व | Importance of Behavior Guidelines




अध्यात्ममार्गात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही.  त्यासाठी क्रमानेच गेले पाहिजे.  प्रथम दीर्घकाळ स्वतःच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे निष्काम भावाने, निस्वार्थपणे कर्मानुष्ठान करावे.  जप, तपश्चर्या, श्रवण, मनन, ध्यान, समाधि या सर्व उच्च, उच्चतर साधना आहेत.  हे सर्व करण्यापूर्वी मनुष्याला प्रथम निःस्वार्थ जीवन जगता आले पाहिजे.  

श्री समर्थ रामदास सोप्या भाषेत सांगतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो |  (मनोबोध)
जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे | जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||  (मनोबोध)

म्हणून जीवन जगत असताना आचारसंहितेला परमोच्च स्थान आहे.  कसे जगावे, कसे बोलावे, कसे चालावे, कसे वर्तन करावे ?  यासाठी काही आचारधर्म आहेत.  ज्ञानाला, विद्वत्तेला आचारधर्मांची जोड नसेल तर ती विद्वत्ता डळमळीत व्हायला लागते.  ते ज्ञान मोक्याच्या वेळी धोका देते.  अशाच लोकांना समर्थ ‘पढतमूर्ख’ असे म्हणतात.  एखादा मनुष्य सुशिक्षित आहे, खूप ज्ञान आहे, जवळ खूप पदव्या आहेत, वक्तृत्वकलेमध्ये निष्णात आहे, परंतु अशा या ज्ञानाला चारित्र्याचा आधार नसेल तर ते पोकळ, शाब्दिक ज्ञान मनुष्याचे रक्षण करू शकत नाही.  

म्हणूनच श्रुति सांगते –
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः |  (महाभारत)
जो धर्माचा त्याग करतो, त्याचा नाश होतो आणि जो धर्माचे रक्षण करतो, त्याचेच रक्षण होते.  म्हणूनच आपल्या जीवनावर धर्माचा अंकुश पाहिजे.  धर्म हा आपल्या जीवनाचे अधिष्ठान आहे.  मानवी जीवनाचे सार आहे.  अन्य योनींच्यामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ सांगितले जातात.  परंतु फक्त मनुष्ययोनीमध्येच अर्थ आणि कामाबरोबरच धर्म आणि मोक्ष हे दोन पुरुषार्थ दिलेले आहेत.  धर्म म्हणजेच अत्यंत नियमित, चारित्र्यसंपन्न, सदाचारसंपन्न, नीतिनियमांनी युक्त असणारे जीवन !  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

No comments:

Post a Comment