Saturday, October 28, 2017

सुंदर दृष्टि | Beautiful Vision




भगवान एक सुंदर दृष्टि सांगतात –
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते | प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||  (गीता अ. २-६५)
चित्ताच्या प्रसन्नतेमुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा निरास होतो आणि प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धि लवकरच उत्तम प्रकारे स्थिर होते.  साधकाने जीवनामध्ये एका बाजूला आपले प्रत्येक कर्म सेवावृत्तीने ईश्वरार्पण करावे व दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या कर्माचे चांगले-वाईट, कमी-जास्त, अपेक्षित-अनपेक्षित फळ प्राप्त होईल तेव्हा ते फळ परमेश्वराचाच प्रसाद आहे, या वृत्तीने समाधानाने ग्रहण करावे.

ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जाऊन देवाला फळे, फुले, पेढे, पाणी अर्पण करतो.  मनोभावे प्रदक्षिणा घालतो व त्यानंतर पुजारी आपल्या हातामध्ये काहीतरी प्रसाद ठेवतो.  त्यामध्ये मग आपणच आणलेला पेढा असेल, खडीसाखर असेल किंवा पाणी असेल.  वस्तुतः बाजारातील खडीसाखर व आत्ता हातामध्ये आलेली खडीसाखर यात काही फरक झालेला नाही.  किंवा पाण्यामध्येही फरक झालेला नाही.  पाण्यामध्येही H2O आहे व तीर्थाचे पाणी सुद्धा H2O आहे.  मग फरक कुठे आहे ?  फरक बाहेर पदार्थामध्ये नाही.  तर फरक आपल्या मनामध्ये झालेला आहे.  तीच खडीसाखर, पेढा, पाणी किंवा वस्तु जेव्हा देवाला स्पर्श करून आपणास मिळते, तेव्हा आपण ती वस्तु न पाहता त्यामध्ये “प्रसाद” पाहतो.  

इतकेच नव्हे, तर त्यावेळी आपण आपल्याला काय प्रसाद मिळाला ?  किती मिळाला ?  हे न पाहता उलट आपल्याला प्रसाद मिळाला, आपण भाग्यवान आहोत, असे मानून जे काही असेल ते आनंदाने व प्रसन्न मनाने ग्रहण करतो.  स्वीकार करतो.  त्यामुळे तिथे मनामधील रागद्वेषादि प्रतिक्रिया संपतात.  आवडनावड संपते.  हेवेदावे, मत्सर, कपट, असूया, स्वार्थ, लोभ, अभिमान हे सर्वच दोष नाहीसे होतात.  सर्व प्रतिक्रिया संपतात.  मन रागद्वेषरहित, द्वंद्वरहित झाल्यामुळे शुद्ध, सत्वगुणप्रधान व प्रसन्न होते.  हेच प्रसादवृत्तीचे फळ आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

No comments:

Post a Comment