Tuesday, July 4, 2017

ज्ञानी राजा, उन्नत समाज | Wise Ruler, Progressive Society


इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेSब्रवीत् ||   (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-०१)
मी हा अविनाशी योग कल्पारंभी विवस्वानाला, विवस्वानाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितला.

श्रेष्ठ ज्ञानाने युक्त असलेले राजे उदात्त ध्येयाने प्रेरित होवून निस्पृह होतात आणि मानवजातीच्या कल्याणासाठी त्यागमय निःस्वार्थ जीवन जगतात.  ते समाजाला प्रेरणा व स्फूर्ति देतात.  राजे लोकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्माचे रक्षण करणे.  धर्माचे रक्षण म्हणजे केवळ मंदिरांचे रक्षण नाही, कारण धर्म हा बाह्य विषयांवर आश्रित नसून मनुष्यावर आश्रित आहे.

त्यामुळे जे धर्माचे अनुसरण करून रक्षण करतात, त्या धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे, कारण धर्मनिष्ठ विद्वान लोक समाजामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार, कर्तव्यपारायणता, श्रेष्ठ नीतिमूल्ये आणि सद्गुणांची जोपासना करतात.  समाजाला उदात्त ध्येयाने प्रेरित करतात.  त्यामुळे समाजामध्ये श्रेष्ठ नीतिमूल्यांचे जीवन निर्माण होवून सुसंगति, सुसूत्रता निर्माण होते.  म्हणून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या श्रेष्ठ विद्वान पुरुषांचे रक्षण करणे हेच कर्तव्य आहे.

याप्रकारे समाजामध्ये विवेकी, क्षत्रिय आणि विद्वान ब्राह्मण यांचा योग्य समन्वय झाला तर तो समाज ध्येयवादी, सुसंस्कृत होतो.  म्हणून अशा प्रकारची दृष्टि असलेला, प्रजेचा हितकर्ता, प्रजेसाठी जगणारा प्रजाहितदक्ष राजा असेल तर समाजाची उन्नति होते.  राजाला धर्माचे अधिष्ठान असेल व ब्राह्मणांना राजाचा आश्रय असेल तर सर्व समाज सुरळीत चालेल.  म्हणून याठिकाणी भगवंतांनी ही दृष्टि लक्षात ठेवून क्षत्रिय परंपरा सांगितलेली आहे.  इतकेच नव्हे तर, हे दिव्य ज्ञान भगवंतांनी रणभूमीवर सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्धर अर्जुनाला दिलेले आहे.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ


No comments:

Post a Comment