Tuesday, July 11, 2017

अन्न ग्रहणात संतोष | Satisfaction in Partaking Food


विधिवशात् प्राप्तेन संतुष्यताम् |
विधिवशात् किंवा प्रारब्धवशात् प्राप्त होणाऱ्या अन्नात साधकाने संतोष मानावा.  अन्नासाठी त्याने याचना व प्रयत्न करावयाचे नाहीत.  अशा परिस्थितीत त्याने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण कसे करावे ?

विधिवशात् म्हणजे कर्मवशात् होय.  कोणताही जीव किंवा मनुष्य जन्माला येतो त्यावेळी निश्चितपणे त्याच्या जीवनाचे आवश्यक असणारे पूर्वनियोजन केलेले असते, कारण पूर्वजन्मात जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याचा जन्म म्हणजे त्याबरोबर त्याचे शरीरही निश्चित केले जाते व त्याच्या शरीरनिर्वाहाचे नियोजनही आधीच केलेले असते.  म्हणून सत्कृतस्य दुष्कृतस्य कर्मवशात् |’ किंवा जन्मान्तरकृतस्य कर्मणाअसे सांगितले आहे.  ज्या कर्मामुळे हे शरीर जन्माला येते ते कर्मच शरीराचे पोषण, रक्षण व वर्धन करते.

प्रारब्धं पुष्यति वपुः |
प्रारब्धकर्म म्हणजेच पापपुण्यात्मक कर्मच या शरीराला जन्म देऊन त्याचे पोषण करते.  जीवन जगत असताना मनुष्य स्वतःच्या कर्माची फळे उपभोगत असतो.  त्याला कर्मानुसार निश्चितपणे अन्न मिळते.  म्हणून कर्मफलाच्या स्वरूपात, प्रयत्न न करता व याचना न करता साधकाजवळ येईल त्या अन्नात त्याने संतोष मानावा.  आपण रोज अन्न ग्रहण करतो ते प्रारब्धामुळेच, हे जसे सत्य आहे तसेच एखाद्या दिवशी अन्न मिळत नाही ते ही प्रारब्धामुळेच.

तसेच प्रारब्धात अन्न पोटात जावयाचे नसेल तर पुढे भरपूर अन्न असूनही मनुष्याला दुर्बुद्धि होऊन तो अन्न खाण्याचे नाकारेल.  याउलट प्रारब्धात मनुष्याला अन्न मिळणार असेल तर त्याच्या जबरदस्त श्रद्धेने, निष्ठेने परमेश्वराची प्रार्थना केल्याने बसल्याजागी त्याला कोणीतरी अन्न आणून देईल.  याच कारणास्तव साधकाने प्रारब्धानुसार जे मिळेल, त्या अन्नात संतोष मानावा.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ





No comments:

Post a Comment