Tuesday, June 13, 2017

पापी जीवांचा उद्धार | How Sinners are Uplifted ?


पापी जीवांचा आचार्य कसा उद्धार करतात ?  प्रथम कोणत्याही पुरुषाला आपल्या पापकर्मांचा मनोमन पश्चात्ताप झाला पाहिजे.  त्याला स्वतःच्या पापकर्मांची जाणीव होऊन तो जे करतो ते सर्व व्यर्थ, निष्फळ आहे, हे समजले पाहिजे.  यामधूनच अंतरिक तळमळ आणि व्याकुळता निर्माण होऊन, या पापकर्मामधून पार होण्यासाठी, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी योग्य मार्गाचा तो शोध घेईल.

त्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ साधु पुरुष येईल.  त्यावेळी नितांत श्रद्धेने त्यांना समर्पण होऊन त्यांची मनोभावे काया-वाचा-मनासा दीर्घकाळ अखंडपणाने सेवा करावी.  यामुळे हळूहळू त्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होईल.  अधर्माचरण, पापाचराणापासून निवृत्त होऊन सदाचार आणि सत्कर्मामध्ये प्रवृत्त होऊन तो धार्मिक होईल आणि यामुळे इंद्रियांच्यावर संयमन होऊन स्वैर, उच्छ्रुंखल, विषयोपभोगामध्ये रत असलेली इंद्रिये त्याच्या ताब्यात येतील.  वाणीने परमेश्वराचे भजन केल्यामुळे वाकशुद्धि होईल.

मनामध्ये श्रद्धा, भक्तीचा उदय झाल्यामुळे हळूहळू निष्काम वृत्ति निर्माण होऊन सेवा, त्याग, विनयशीलता वगैरेदि सद्गुणांचा उत्कर्ष होईल.  परमेश्वराच्या व गुरूंच्या अखंड चिंतनामुळे मन सर्व बाह्य विषयांमधून निवृत्त होऊन अंतर्मुख, एकाग्र, गुरुमय होईल.  विषयांचे आकर्षण, आसक्ति, भोगलालसा कमी होईल.  या प्रदीर्घ साधनेमुळे त्याचे चित्त शुद्ध होऊन तो गुरूंचा उपदेश ग्रहण करण्यासाठी अधिकारी होईल.

आचार्य म्हणतात –
सत्सङगत्वे निःसङगत्वं निःसङगत्वे निर्मोहत्वम् |
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||   (भज गोविन्दम् )
सत्संगामुळे विषयासक्ति कमी होऊन निर्मोहत्व प्राप्त होते.  त्यामुळे अंतर्मुख झालेले मन तत्त्वचिंतन करून निश्चल, स्थिर, एकाग्र होते आणि स्वस्वरूपामध्ये सुस्थिति प्राप्त केल्यामुळे जीवनमुक्तावस्था प्राप्त करते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ


No comments:

Post a Comment