Tuesday, March 22, 2016

सुख-दुःखांचे अनुभव का येतात ? | Why We Experience Joy & Grief ?


इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग येतो त्यावेळी इंद्रिये कोणताही विषय असो, त्या विषयाच्या स्वभावप्रमाणे शीत-उष्ण वगैरे अनुभव देतात.  परंतु हे अनुभव आपल्या मनात प्रत्येक वेळी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करतात.  कधी सुखकारक, कधी दुःखकारक, कारण एकच वस्तु स्थानकालभेदाप्रमाणे अनुकूल ठरते तर भिन्न काळात प्रतिकूल ठरते.  थंड पेय उन्हाळ्यामध्ये सुखकारक असते, परंतु थंडीमध्ये मात्र दुःखकारक ठरते.  त्याउलट उष्ण पेय थंडीमध्ये खूप आनंद देणारे होते तर उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणारे होते.

याचाच अर्थ इंद्रियांचा विषयांशी झालेला संयोग प्रत्यक्ष सुखदुःखांचा अनुभव देत नाही.  इंद्रियांचे कार्य फक्त बाह्य विषयांचे जसेच्या तसे ग्रहण करणे होय. सुखदुःखाला आपले मनच कारण आहे.

तो प्रत्येक प्रसंग अनुकूल, प्रतिकूल निर्माण करतो, कारण प्रत्येक प्रसंग, अनुभव हा स्वतःनेच निर्माण केलेल्या कल्पनांच्यामधून तूलानात्मक दृष्टीने पाहातो.  मला ग्रीन लेबलचा चहा आवडत असेल तर त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही चहा मला समाधान देत नाही.  हा प्रत्येकाचा अनुभव आहे.  यामधून तो मनात अनेक प्रकारची द्वंद्वे निर्माण करून दुःखांचा, यातनांचा अनुभव घेतो.  म्हणून हे सर्व अनुभव प्रत्यक्ष विषय देत नसून स्वतःचे राग-द्वेष देत असतात.  विषय फक्त निमित्तमात्र असतात.

म्हणून साधकाने विषयांच्या किंवा प्रसंगांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रागद्वेषात्मक प्रतिक्रिया कमी करण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  रागद्वेषांच्या द्वंद्वांच्या आहारी न जाता मन द्वंद्वरहित करून संतुलित ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे.  म्हणजेच अशा प्रकारचे मन तयार केले पाहिजे की, बाह्य विषय, प्रसंग, अनुभव मनाला विचलित, अस्वस्थ करणार नाहीत.  यामुळे रागद्वेषांचा मनावर होणारा परिणाम कमी होईल.  मन अधिक अंतर्मुख होऊन चिंतनशील होईल.  ही साधना करणे आवश्यक आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment