Tuesday, March 8, 2016

जन्म-मृत्यू पलीकडे | Beyond Birth & Death


आपण फक्त वर्तमानकाळात इंद्रियगोचर असणारे शारीरिक अस्तित्व पाहतो.  इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे दृष्टि जात नाही.  स्वतःकडे किंवा इतरांकडे पाहताना हीच शारीरक दृष्टि असते आणि जे दिसते तेच सत्य वाटते.  त्यामुळे जन्म आणि मृत्यु या दोन घटनांच्या अलीकडे आणि पलीकडे दृष्टि जातच नाही.  तो फक्त जन्ममृत्युयुक्त शरीर व त्यात राहणारा, शरीराशी तादात्म्य पावणारा शरीरधारी एवढीच संकुचित, मर्यादित, स्थूल दृष्टि असते.

ज्याप्रमाणे एखाद्या हॉलमध्ये एका भिंतीमधून वेगाने बाण आला आणि दुसऱ्या भिंतीमधून नाहीसा झाला, तर एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंतच आपल्याला बाणाचे अस्तित्व दिसते.  प्रवेश करण्यापूर्वी भिंतीच्या अलीकडे आणि नाहीसा झाल्यानंतर भिंतीच्या पलीकडे बाणाचे अस्तित्व दिसत नाही, कारण आपली दृष्टि दोन भिंतींनी मर्यादित होते.  परंतु याचा अर्थ असा नाही की, बाणाचे अस्तित्व दोन भिंतीतच आहे.  प्रवेश करण्यापूर्वी आणि दृष्टीपलीकडे गेला तरीही बाणाची सत्ता आहेच.  परंतु ती सत्ता आपल्या दृष्टीला दिसत नाही.  म्हणून आपल्या दृष्टीची कक्षा वाढविली तर पूर्वीचे आणि नंतरच्या बाणाचे अस्तित्व दिसेल.

त्याचप्रमाणे आम्ही फक्त शरीर पाहतो.  शरीराला सत्यत्व देतो.  त्यामुळे शरीर आणि त्याचे जन्ममृत्यु एवढेच खरे वाटते.  परंतु शरीर हे कार्य असून जन्माच्या वेळी ‘मी’ शरीरामध्ये प्रवेश केला आणि मृत्युच्या वेळी शरीराचा त्याग केला.  जन्म आणि मृत्यु शरीराला आहे.  शरीरात प्रवेश करणारा आणि शरीराचा त्याग करणारा ‘मी’ आहे.  मग ‘मी’ फक्त शरीर आहे का ?  शरीरापासून ‘मी’ भिन्न आहे का ?  आपली आज दृष्टि शरीरावरच आहे.  परंतु भगवान अर्जुनाला शरीराच्या पलीकडे ‘मी’ या शब्दाने सूचित केलेल्या तत्त्वाच्या दृष्टीने पाहायला सांगतात.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment