Tuesday, March 15, 2016

जन्म-मृत्यू केवळ शरीराला | Birth & Death Only for The Body


जन्म आणि मृत्यु किंवा उत्पत्ति-स्थिति-लय हे फक्त शरीराला आहेत.  परंतु या तीन्हीही घटनांच्या मध्ये प्रवेश करणारा, वर्तमानकाळात शरीरात राहणारा आणि मृत्यूच्या वेळी शरीर सोडणारा ‘मी’च आहे.  म्हणून या शरीरात येण्यापूर्वी ‘मी’चे अस्तित्व असलेच पाहिजे.  त्यामुळेच या शरीरात ‘मी’ सत्तारूपाने आहे आणि शरीर नाश पावले तरी ‘मी’ची सत्ता आहेच, कारण तीच सत्ता पुढच्या शरीरात सत्तारूपाने प्रवेश करते.

हे जर मानले नाही तर अनेक दोष निर्माण होतील.  १)  सुखदुःखांच्यामधील नानात्व आणि वैचित्र्य अशक्य होईल, कारण कर्माच्या वैचित्र्यामुळे सुखदुःखांमध्ये वैचित्र्य अनुभवास येते.  त्या सर्व कर्मांचा कर्ता अनेक नसून एकच आहे.  नाहीतर कर्त्याची सत्ता संपेल.  २)  जे कर्म केलेले नाही त्याचे फळ जीवाला भोगावे लागेल.  त्यामुळे कर्म आणि कर्मफळ यांच्यात सुसूत्रता, नियमितता राहाणार नाही आणि विश्वात नियम राहाणार नाहीत.  एखाद्याने कर्म करावे आणि त्याचे फळ मिळूच नये किंवा ते दुसऱ्याला मिळावे, असे झाले तर गोंधळ निर्माण होईल.

पूर्वीच्या अनेक जन्मात केलेल्या कर्माचे फळ जीव या जन्मात उपब्भोगतो.  किंवा जो कर्म करतो तोच कर्ता त्या कर्मफलाचा उपभोग घेतो.  जर मागील जन्माची आणि या जन्माची सत्ता यांचा कोणताच संबंध नसेल तर मागील जन्माचे पापपुण्यात्मक फळ व या जन्मात भोगावी लागणारी कर्मफळे यांचा समन्वय, कारणमीमांसा करता येणार नाही.  सुख-दुःख का ?  आणि त्यातील वैचित्र्य का ?  याची संगति लागणार नाही.  म्हणून या जन्मातील कर्माचे फळ आज ना उद्या भोगलेच पाहिजे आणि त्यामध्ये शरीराचा मृत्यु आला तर कर्म संपत नसून ते पुढील जन्मामध्ये भोगलेच पाहिजे.  ज्याने कर्म केले त्यालाच ते भोगले पाहिजे.

जीव शरीरइंद्रियादिपासून भिन्न असून शरीराला जन्ममृत्यु असले तरी जीव मात्र एका शरीरामधून दुसऱ्या शरीरात जातो.  म्हणून तो नित्य आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment