Tuesday, November 3, 2015

गीतोपदेशाचे खरे अधिकारी - १ | Eligibility for Learning Geeta - 1


गीतेचा उपदेश वास्तविक अर्जुनाला केलेला असेल तरी प्रत्येक जीवाला केलेला आहे, कारण अर्जुनाने विचारलेला प्रश्न हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न नसून तो सर्वांचा आहे.  तो सर्व मानवजातीचा आहे.  तो कोणत्याही काळातील प्रत्येक मनुष्याचा प्रश्न आहे.  अर्जुनाची मानसिक स्थिति आणि त्याने अनुभवलेला असह्य, व्याकूळ करणारा अंतरिक शोक आणि मोह, आजही आधुनिक काळामध्ये प्रत्येक मनुष्य अनुभवत आहे.  आजचा बुद्धिमान मानवही अनेक प्रकारची मानसिक द्वन्द्व, संघर्ष अनुभवतो.

अर्जुनाची युद्धभूमीवर जी अवस्था झालेली होती तीच आज आमचीही आहे.  त्यामुळे काळ बदलला तरी दोघांच्या अंतरिक अवस्थेमध्ये काहीच फरक नाही.  अर्जुनाप्रमाणे आम्ही सर्व गीतेच्या उपदेशाचे अधिकारी आहोत.  तेथे वर्ण, आश्रम, धर्म, जात, पंथ, उच्च, नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, श्रीमंत-गरीब कोणताच भेद नाही.  धर्म, राष्ट्र यांच्याही मर्यादा नाहीत.  थोडक्यात प्रत्येक मनुष्य गीतेचा अधिकारी आहे.

दुर्दैवाने प्रत्येक मनुष्य दुःखाचे, शोकाचे कारण बाहेर शोधत असतो आणि विषयांची पुन्हा पुन्हा नवीन नवीन मांडणी करून, प्रसंग, विषय, माणसांना टाळून किंवा अदलाबदल करून दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो.  या लोकांना दुःखाचे निश्चित कारणच सापडलेले नाही.  अंतर्मुख होऊन विचार करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये असत नाही.  त्यामुळे ते जीवन जगत असले तरी ते खरे साधकच नाहीत.  ते फक्त पशुप्रमाणे विषयांतच रमतात.  विषय हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम साध्य राहाते.  म्हणून याप्रकारचे लोक गीतोपदेशाचे खरे अधिकारी होऊ शकत नाहीत.

क्रमशः ...


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

No comments:

Post a Comment