Tuesday, November 10, 2015

गीतोपदेशाचे खरे अधिकारी - २ | Eligibility for Learning Geeta - 2


जो मनुष्य भौतिक जीवन जगत असताना आपले मन आणि बुद्धि पूर्वग्रहदूषित न ठेवता, मोकळ्या मनाने (Open Mind) बाह्य जगाचे, विषयांचे, उपभोगांचे निरीक्षण करतो आणि वैचारिक जीवन जगतो त्याला आपोआपच बाह्य विषयांच्या मर्यादा, त्यांचे क्षणभंगुरत्व तसेच हे सर्व विषय आपल्याला सुखी आणि आनंदी करण्याऐवजी अधिक दुःख, विवंचना, चिंता, उद्विग्नता, निराशाच देतात हे समजते. सुख लेशमात्रही मिळत नाही.  हे पाहून त्याचे विषयांचे आकर्षण कमी होते.

तो अधिक अंतर्मुख होतो आणि त्याला समजते की, आपले मनच आपल्याला दुःखी करीत आहे.  मनच आपल्या सर्व विक्षेपाचे, द्वन्द्वांचे कारण आहे.  आपलेच मन आपल्याला सर्व बाह्य विषयांची उपलब्धता असूनही सुखाने, शांतीने जगू देत नाही.  मनामध्ये असलेले कामक्रोधादि विकारच सारखे आघात करून आपल्या जीवनातील खरी शांति हिरावून नेतात.

या कामक्रोधादि विकारांच्या जबड्यामधून सुटल्याशिवाय खरी शांति मिळणार नाही.  त्यामुळे तो अत्यंत अगतिक होतो.  अंतरिक शांति कशी मिळेल, हाच एक त्याचा खरा प्रश्न राहतो.  बाकी सर्व प्रश्न आपोआपच गळून पडतात.  हा जीवनाचा मूलभूत प्रश्न ज्याला समजलेला असून त्यामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो तोच खरा साधक आहे.  मुमुक्षु आहे.

तो अर्जुनाप्रमाणे काहीही मागत नाही.  फक्त मागतो ती आत्मशांति !  तोच अर्जुनाप्रमाणे गीतोपदेशाचा खरा अधिकारी आहे.  अशा जीवाने आत्मशांतीसाठी अर्जुनाप्रमाणे गुरूंना शरण जावे.  ते गुरु त्याला भगवंताप्रमाणेच उपदेश देतील.  म्हणून सर्व मानवजातीला अनंतकाळापर्यंत उपदेश करणारी, दीपस्तंभाप्रमाणे दिशा देणारी, मार्गदर्शन करणारी, जीवन परमशांतीने भरून तृप्त करणारी ही श्रीमद्भगवद्गीता आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment