Tuesday, August 25, 2015

मनुष्य जीवनाचा यज्ञ | Yajnya of Human Life


देवांचा मानसिक यज्ञ सांगण्यामागे श्रुतीला केवळ बाह्य यज्ञ किंवा कर्मकांड अपेक्षित नसून साधकाला यामधून काहीतरी श्रेष्ठ सांगावयाचे आहे. आपले संपूर्ण जीवनच यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नसून यज्ञ म्हणजे अर्पण करणे आहे.

यज्ञामध्ये सतत तूप घालावे लागते. या व्यष्टि यज्ञात तूप म्हणजे स्निग्धता, स्नेहभाव, ममत्व. हा ममत्वभाव यज्ञात अर्पण केला तरच ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो. आज साधकाच्या अंतःकरणामध्ये विषय, व्यक्तींविषयी ममत्व असल्यामुळे हा माझा, हा परका ही कूपमंडुक वृत्ति निर्माण होते. फक्त माझे घर, माझी मुले, इतकीच सीमित दृष्टि बनते. मात्र, ज्ञानाग्नि प्रज्वलित करावयाचा असेल तर ममत्वरूपी तूपाचे सतत समर्पण केले पाहिजे.

ग्रीष्म ऋतु म्हणजे कडक उन्हाळ्यात झाडांच्या फांद्या वाळतात व त्याच नंतर समिधा म्हणून वापरतात. या समिधा म्हणजेच अंतःकरणातील वासना होत. प्रथम या समिधा ओल्या, स्निग्ध असतात. त्यांना शुष्क करण्यासाठी उन्हाळा आवश्यक आहे. साधकाच्या जीवनात प्रखर वैराग्याशिवाय साधना शक्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

शरद ऋतु हा हविस् द्रव्य आहे. हविस् द्रव्य म्हणजेच जीवनातील शब्दस्पर्शरूपरसगंधादि भोग्य विषय आहेत. त्या सर्वांचे अर्पण करावे. त्यासाठीच शास्त्रात अनेक प्रकारची दाने सांगितलेली आहेत. अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान या सर्व दानांमधून अर्पण वृत्ति आत्मसात करण्यास सांगितलेली आहे.

थोडक्यात, स्वतःमध्ये असणारे ममत्व, स्नेह, ऐहिक, पारलौकिक कामनेचा त्याग करावा. या यज्ञाचे हविस् द्रव्य म्हणजे प्रत्येक जिवामध्ये असणारा अहंकार आहे. अहंकाराला अर्पण करणे हीच या यज्ञाची पूर्णाहुति आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006




- हरी ॐ

No comments:

Post a Comment