Tuesday, November 4, 2014

पंचयज्ञ | Five Sacrifices

गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात.
१) कण्डनं – कांडणे, २) पेषणी – दळणे, ३) चुल्ली – चूल पेटविणे, ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे , ५) मार्जनी – झाडलोट वगैरेदि.
 
वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक जीवाणूंची हिंसा करीत असतो.  त्यासाठी प्रत्येक गृहस्थाश्रमीने पाच यज्ञ करावेत.
 
१. भूतयज्ञ – आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातील एक भाग चिमण्या वगैरेदि पक्ष्यांना द्यावा, कारण आपले जीवन समृद्ध करण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांचा सहभाग असतो.
२. अतिथियज्ञ – जो कोणी आपल्याकडे येईल त्याला श्रद्धेने अन्नदान करावे.  शास्त्र सांगते – अतिथिदेवो भाव |
३. पितृयज्ञ – पितरांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध होत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक भाग द्यावा.
४. देवयज्ञ – देवांसाठी एक भाग अर्पण करावा.
५. वैश्वदेव यज्ञ – एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देवून विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.
 
याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.  अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.  म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.  ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.  म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.  मन शुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment