Tuesday, November 25, 2014

भक्ति आणि तृप्ति | Devotion and Contentment


सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात अतृप्तीचा अग्नि पेटलेला असल्यामुळे तो पूर्ण करण्यासाठीच मनुष्य अनेक प्रकारच्या कामना निर्माण करतो.  रात्रंदिवस त्याची घोडदौड चालूच आहे.  परंतु विषयांचा संग्रह करून किंवा उपभोगून विश्वामध्ये आजपर्यंत कोणीही तृप्त झालेले नाही.  कामाग्नि कधीही संतुष्ट झालेला नाही.  उलट तो अधिक वाढतच आहे.  हिरण्यकाश्यपु, सम्राट ययाति, त्रिभुवन जिंकणारा अजिंक्य रावण सुद्धा सुद्धा तृप्त झालेले नाहीत.

ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन किंवा तूप सतत हवन केले तरी अग्नि कधीही शांत न होता अधिकच प्रज्वलित होतो.  त्याचा भडका, दाह, उष्णता वाढते.  त्याचप्रमाणे कितीही कामनांचा उपभोग घेतला तरी मनुष्य नित्य अतृप्तच राहातो.  तो असंतुष्टच राहातो.

भक्ताला मात्र परमप्रेमस्वरूप भक्ति प्राप्त झाल्यावर त्याचे फळ म्हणजे तो तृप्त होतो.  त्याचा हव्यास संपतो.  तृष्णा संपतात कारण परमात्मप्राप्तीमुळे त्याच्या सर्व कामना गळून पडतात.  अशी ही परमप्रेमस्वरूप भक्ति भक्ताला आनंदस्वरूप करते, परमात्मस्वरूप बनविते.  त्याव्यतिरिक्त सर्व प्राप्ति अपूर्ण, मर्यादित, नाशवान, क्षणभंगुर आहे.

ज्या स्वरूपामध्ये दृक्-दृश्य-दर्शन, ज्ञाता-ज्ञेय-ज्ञानदि त्रिपुटींचा व्यवहार, द्वैताचा व्यवहार संपतो म्हणजे त्रिपुटीरहित जे स्वरूप आहे ते अद्वैत, अखंड, देशकालवस्तुपरिच्छेदशून्य, स्वयंसिद्ध, निरतिशय आनंदस्वरूप आहे तेच भूमा (अमर्याद) आहे.  हे जीवाचे स्वरूप आहे. याचाच अर्थ प्रत्येक जीव ज्या आनंदस्वरूपाचा शोध घेत असतो तोच हा आनंद आहे.  म्हणून या निरतिशय आनंदाच्या अनुभूतीने भक्त सर्व विषयांच्यापासून निवृत्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो.  तो तृप्त होतो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

No comments:

Post a Comment