Wednesday, June 11, 2014

मम धर्मः कः ? | What is my ‘Dharma’ ?



महाभारतामध्ये भीष्मपर्वात २५व्या अध्यायात श्रीमद्भगवद्गीता अंतर्भूत आहे.  गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते.  गीतेचे वैशिष्ट्य पाहिले तर आरंभ ‘धर्म’ या शब्दाने होतो आणि शेवट ‘मम’ या शब्दाने होतो.  हे दोन शब्द एकत्र आणले तर ‘ममधर्मः’ हे विधान होते.  हाच अर्जुनाचा प्रश्न असल्यामुळे – मम धर्मः कः ? माझा धर्म कोणता ?  या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच संपूर्ण गीता होय. 

येथे धर्म म्हणजे हिंदु, मुसलमान वगैरे हा प्रचलित अर्थ अभिप्रेत नाही.  तर धर्म म्हणजे कर्तव्य हा एक अर्थ आहे.  हा अर्थ घेतला तर, माझे कर्तव्य कोणते ?  हा सतत प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो.  याचे कारण जीवनामध्ये अनेक प्रसंगांच्यामधून जात असताना प्रत्येक प्रसंगांमध्ये आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचा बुद्धीने कितीही साधकबाधक विचार केला तरी निर्णय होत नाही आणि जो निर्णय घेतला जातो तो रागद्वेषांनी प्रेरित होऊन स्वार्थ आणि लोभाने घेतला जातो.

ज्यामुळे आपला स्वार्थ पूर्ण होत असेल तेच कर्तव्य आहे असा विचार असतो.  परंतु निर्णय घेऊन सुद्धा मानसिक द्वंद्व राहातेच.  मानसिक संभ्रम राहातोच.  म्हणून याच कारणामुळे अर्जुनाने – मम धर्मः कः ?  हा प्रश्न विचारून रागद्वेष, द्वंद्वरहित कर्म कसे करता येईल ?  हा प्रश्न विचारला.  याचे सांगोपांग उत्तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सूत्रबद्ध प्रतिपादित केलेले आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment