Tuesday, June 3, 2014

भगवद्गीतेचे माहात्म्य | Importance of Bhagvad Geeta

 

विश्वाचे आणि जीवनाचे गूढ रहस्य आणि पारमार्थिक तत्त्वाचे स्वरूप भगवद्गीतेमधून प्रकट केलेले आहे.  तेच भगवंताचे स्वरूप आहे.  यामुळे गीता अन्य ग्रंथांच्याप्रमाणे नसून भगवान श्रीकृष्णांची वाड़्ग्मयीन मूर्तीच आहे.

भगवद्गीता सर्व शास्त्रांचे सार असून त्यामध्ये सर्व शास्त्रे अंतर्भूत आहेत.  ज्याप्रमाणे अमर्याद समुद्र सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो.  हे सामर्थ्य फक्त सागरामध्ये आहे.  नदीमध्ये नाही. त्याचप्रमाणे अन्य सर्व ग्रंथ किंवा शास्त्रे एकदेशीय, मर्यादित असून त्या सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे, कारण भगवद्गीता हा परिपूर्ण स्वरूपाचा ग्रंथ आहे.

भगवद्गीता हे महाभारताचे अमृतरूपी सार असून प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या मुखकमलामधून उद्घोषित झालेले आहे.  असे हे गीतारूपी गंगोदक प्राशन करून जीवाला पुन्हा कधीही जन्म प्राप्त होत नाही.

गीता हा स्मृतिग्रंथ असूनही त्यामध्ये केवळ धर्माधर्माचा किंवा विधिनिषेधाचा विचार केलेला नसून “तत्त्वमसि” महावाक्यामधून प्रतिपादित केलेले जीवाचे आणि परमेश्वराचे पारमार्थिक स्वरूप प्रकट करून त्यांच्यामधील ऐक्य सिद्ध केलेले आहे.

गीता ही सर्व जीवांना एकात्मतेचा, विश्वबंधुत्वाचा, अद्वैताचा संदेश देणारी आहे.  हीच परमोच्च अखंडत्वाची दृष्टि जीवाचा अज्ञानजन्य संसार नाहीसा करून अत्यंत दुःखनिवृत्ति करते आणि निरतिशय आनंदाची प्राप्ति करून देते.  म्हणून गीता मोक्षदायिनी असल्यामुळे धर्मशास्त्र नसून मोक्षशास्त्र आहे.  हेच गीतेचे माहात्म्य आहे 

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment