Tuesday, May 27, 2014

भगवद्गीतेचे वैशिष्ठ्य | Uniqueness of Bhagwat Geeta


 
विश्वामधील सर्व ग्रंथ निरनिराळ्या प्रकाराने बाह्य विषयांचे ज्ञान देतात.  मग ते भौतिकशास्त्र असो, शरीरशास्त्र किंवा मानसशास्त्र वगैरे कोणतेही शास्त्र असो.  परंतु जीवनाचे गूढ रहस्य उलगडून जीवनाला दिशा देणारा, प्रेरणा आणि स्फूर्ति देणारा, जीवनाचा विकास करून जीवन परिपूर्ण करणारा असा एकही मार्गदर्शक ग्रंथ नाही.

याउलट अनेक प्रकारच्या विषयांचे ज्ञान मनुष्याच्या मनामध्ये रागद्वेष, कामक्रोधलोभ वगैरेदि विकार निर्माण करून विषयासक्त बनविते.  मनुष्यामधील श्रद्धा, प्रेम, सेवा, कर्तव्यपरायणता, त्याग, निस्वार्थ वृत्ति, माणुसकी नाहीशी करते.  मनुष्य अधिक उन्नत न होता स्वैर, उच्छ्रुंखल, हिंसाचारी, पशुतुल्य बनतो.  हेच आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.  त्यामुळे जगामध्ये असा एकही ग्रंथ नाही की, जो मनुष्याच्या अंतःकरणामधील पाशवी आणि राक्षसी प्रवृत्तींचा नाश करून सद्गुणांचा, श्रेष्ठ नीतिमूल्यांचा उत्कर्ष करून मनुष्याला सद्विचार आणि सदाचारामध्ये प्रवृत्त करेल.  जीवनाचे सर्वांगसुंदर दर्शन घडविणारा असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय.

भगवद्गीता आरशाप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचे दर्शन देणारा अलौकिक ग्रंथ आहे.  आपल्या स्वतःचा चेहरा आपल्याजवळच असूनही आपण कधीही पाहू शकत नाही.  तो अत्यंत जवळ असूनही फार फार दूर आहे.  तो पाहाण्यासाठी आरशाची आवश्यकता असते.  त्यासाठी आरसा हा साधन होतो.

त्याचप्रमाणे जीवनाचे खरे परिपूर्ण दर्शन आपल्या अंतरंगामध्येच स्वस्वरूपाने आहे.  परंतु अज्ञानाच्या आवरणामुळे ते दिसत नाही, अनुभवायला येत नाही.  ते दर्शन घेण्यासाठी असलेला आरसा म्हणजेच ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय.  या महाकाव्यामधून भगवंतांनी हळूवारपणे प्रत्येकाचे अंतरंग उलगडून स्वस्वरूप प्रकट केलेले आहे.  भगवद्गीतेचे चिंतन करणे योग्य कर्तव्य आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ
 

No comments:

Post a Comment