Tuesday, May 13, 2014

तितिक्षेमधून प्रसन्नता | Cheerfulness through Endurance

 
 
कोणत्याही अनुभवामध्ये तीन घटक असतात –
१.   ज्या विषयांचा अनुभव घेतो ते विषय
२.   ज्यांच्या साहाय्याने अनुभव घेतो ती इंद्रिये आणि
३.   ज्याठिकाणी सुखदुःखाचा अनुभव येतो ते मन
 
यामध्ये तीन्हीही घटक सतत बदलणारे आहेत.  हा प्रत्येकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे.  मग सतत बदलणाऱ्या विकारयुक्त, अस्थिर मनामध्ये बदलणाऱ्या इंद्रियांच्या साहाय्याने अनित्य विषयांच्यामधून नित्य, स्थिर टिकणारा अनुभव कसा मिळेल ?  शक्यच नाही.
 
म्हणून बाहेरून प्रसंग बदलून चालणार नाही.  प्रयत्न करा किंवा न करा, प्रसंग हे येणारच !  म्हणून मनाची दृष्टि बदलणे हाच पुरुषार्थ आहे.  त्यासाठी भगवान अर्जुनाला आणि सर्व साधकांना उपदेश देतात – तान् तितिक्षस्व भारत |  सर्व प्रसंग, विषय आणि अनुभव यांचे वरीलप्रमाणे स्वरूप जाणून घेऊन सहनशीलता वाढविणे हाच पुरुषार्थ आहे.  हीच साधना आहे.
 
तितिक्षा किंवा सहनशीलता हा साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा गुण आहे.  सहनशीलता हा शरीराचा गुण नसून अंतःकरणाचा आहे.  मन कोणत्याही प्रसंगामध्ये प्रसन्न ठेवणे हा अभ्यास म्हणजेच तितिक्षा होय.  कोणताही प्रसंग स्वतःच्या रागद्वेषामधून किंवा अपेक्षेमधून न पाहाता जसा आहे तसा वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहाण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे व्यक्तिगत रागद्वेषामधून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया कमी होतील.  पर्यायाने रागद्वेष कमी होऊन मन रागद्वेषरहित होऊन शांत, संयमित, विक्षेपरहित, अंतर्मुख होईल.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
- हरी ॐ

No comments:

Post a Comment