Tuesday, May 20, 2014

मनुष्यजन्माचा प्रवाह | Flow of Human Life

 

या दुर्लभ मनुष्यजन्मामध्ये प्रत्येकाची एकच अंतरिक, उत्स्फूर्त इच्छा आहे की, “मी सुखी व्हावे”. आपले जीवन शांतीने आणि आनंदाने परिपूर्ण करणे, हेच मनुष्याचे परमकर्तव्य आहे.

जीवनात अनेक प्रकारची व्यावहारिक कर्तव्ये आहेत.  परंतु ती सर्व प्रसंग किंवा परिस्थिति यांच्या अनुषंगाने मनुष्यनिर्मित सापेक्ष आहे.  त्यामुळे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात तडजोड होत असते.  त्यामध्ये काळानुरूप सतत बदल होत असतो.  परंतु “मी सुखी व्हावे” यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ शकत नाही, कारण ती मनुष्यामध्ये सहजस्वाभाविक प्रवृत्ति आहे.  त्यामुळे मनुष्याला “मी सुखी व्हावे” या इच्छापूर्तीमध्ये स्वातंत्र्य नाही.

ज्याप्रमाणे, नदी एखाद्या डोंगरामध्ये संतत धारेच्या रूपाने उगम पावते आणि क्रमाक्रमाने तिचा विस्तार होऊन अखंड प्रवाहित होते.  तिच्या प्रवाहामध्ये छोटे-मोठे कितीही अडथळे आले तरी त्या सर्वांच्यावर मात करून ती सतत सागराच्या दिशेने धावत असते, कारण सागराशी एकरूप होण्यामध्येच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता, परिपूर्णता असते.  त्याचप्रमाणे सर्व मानवी जीवन सुखाच्या दिशेने, ध्येयाने प्रेरित होऊन नदीप्रमाणेच अखंड गतिमान आहे.

भगवान म्हणतात – मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः |  (गीता अ. ३-२३)

हे पार्थ ! सर्व मानवजात माझ्याच – परमेश्वराच्या मार्गाचे, म्हणजे निरतिशय आनंदाच्या मार्गाचेच सर्व प्रकारे अनुसरण करते.

स्वतःच्या सुखासाठीच मनुष्य सर्वांच्यावर प्रेम करतो. यावरून सिद्ध होते की, मनुष्य पूर्ण सुखी होईपर्यंत सतत, अखंडपणे सुखाच्या मागे धावतो, कारण तोच मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

 
- हरी ॐ
 

No comments:

Post a Comment