Tuesday, April 4, 2023

अनाधिकारी मार्गदर्शक | Unauthorized Mentor



 

अध्यात्माविषयी प्रश्न कोणाला विचारावेत ?  याचे सुद्धा शास्त्र आहे.  मनात प्रश्न निर्माण झाला आणि समोर कोणीही थोडेफार तत्त्वाचे शाब्दिक ज्ञान असणारा विद्वान असला तर त्याला जाऊन विचारणे हे अयोग्य आहे.  अशा कोणालाही विचारले तर त्याचे उत्तर मिळू शकत नाही आणि उत्तर मिळालेच तर ते उत्तर योग्य असेलच, असे सांगता येत नाही.  कदाचित अशा मनुष्याला शास्त्राचे थोडे फार शाब्दिक ज्ञान असेल, कोठून तरी अर्धवट श्रवण केले असेल, परंतु त्याला शास्त्राची दृष्टि असेलच असे सांगता येत नाही.  त्यामुळे तो तत्त्वज्ञ मनुष्य शास्त्रवचनांचा अर्थ स्वतःच्या मर्यादित बुद्धिप्रमाणे व त्याच्यावर झालेल्या संस्कारांच्याप्रमाणे लावत असतो.  त्यामध्ये त्याच्या मनामधील दोषही समाविष्ट होतात.  त्यामुळेच अशा मनुष्याची वचने निंदनीय आणि अग्राह्य असतात.

 

ज्याने कधीच स्वतःच्या गुरूंच्या चरणांशी बसून विधिवत् आत्मविद्या ग्रहण केली नसेल, शास्त्रांचे चिंतन-मनन केले नसेल, तपश्चर्या केली नसेल आणि त्याला गुरूंनी आज्ञा दिली नसेल तर तो कधीही शास्त्रोपदेश करण्यास अधिकारी ठरत नाही.  म्हणून भगवान व्यासांच्या पीठावर कोणी बसावे ?  कोणी ज्ञान द्यावे ?  ब्रह्मविद्येच्या वक्त्याने काय बोलावे आणि काय बोलू नये ?  याचे शिष्टाचार आणि नियम आहेत.  व्यासपीठावर बसल्यावर वक्त्याचे आपल्या प्रत्येक शब्दावर नियंत्रण हवे आणि प्रत्येक शब्दामागे अनुभव हवा.  तरच तो वक्ता श्रोत्याच्या मनावर परिणाम करू शकतो.

 

परंतु याउलट वक्ता योग्य नसेल, अतत्त्वज्ञ असेल, तो अग्राह्य विधाने करीत असेल अशा निंद्य वक्त्याला जो प्रश्न विचारतो त्याच्यासारखा दुसरा मूर्ख माणूस जगात नाही.  म्हणजेच आध्यात्मिक प्रश्न अधिकारी गुरूंच्याशिवाय अन्य कोणालाही विचारू नयेत.  हाच येथे अभिप्राय आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ