Tuesday, December 27, 2022

ज्ञानजिज्ञासेचे मूळ | Root Of Curiosity Of Knowledge

 



रामा !  ज्ञानजिज्ञासा सुद्धा सहजासहजी निर्माण होत नाही.  व्यवहारामधील अन्य सर्व गोष्टींचे महत्व नाहीसे होऊन शास्त्रश्रवण करण्याची तळमळ एखाद्याच भाग्यवान मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते.  अशी तीव्र जिज्ञासा निर्माण होणे म्हणजे जीवाने मागील अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या सुकृतांचे फळ आहे.  पूर्वपुण्याईशिवाय शास्त्राचे शब्द कानावर सुद्धा पडत नाहीत.

 

रामा !  तू तर रघुवंशामधील राजपुत्र आहेस.  ऐश्वर्यसंपन्न, सौन्दर्यसंपन्न असून सर्व विषय आणि उपभोग तुझ्या सेवेला सादर सज्ज आहेत.  अशा या यौवनावस्थेमध्ये सुद्धा तुझ्या अंतःकरणामध्ये अतिशय दुर्लभ अशी विरक्ति निर्माण झाली.  त्या वैराग्याचे वर्णन तू पहिल्या प्रकरणामध्ये शेकडो श्लोकांच्यामधून केलेस.

 

रामा !  तुझे हे वैराग्य केवळ शाब्दिक नव्हते, तर विवेकपूर्ण होते.  म्हणून वैराग्य उदयाला आल्यावर तुझ्या मनामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे ज्ञानजिज्ञासा उत्पन्न झाली.  वैराग्य म्हणजे केवळ घरदार सोडणे किंवा वस्त्र बदलणे नव्हे.  जेथे वैराग्य असेल तेथे जिज्ञासा आवश्यक आहे आणि ज्ञानजिज्ञासा नसेल तर ते वैराग्य साधकाला योग्य दिशेला न नेता अधःपतित करू शकेल.  किंवा असे वैराग्य असेल तर काही काळ साधक घराचा आणि काही विषयांचा त्याग करेल, वस्त्रांचा रंग बदलेल.  परंतु काही काळाने पुन्हा तो संसारमार्गामध्येच प्रवृत्त होईल.

 

म्हणून या मार्गामध्ये वैराग्यप्राप्तीनंतर जिज्ञासा उदयाला येणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.  असे वैराग्य उदयाला आले असेल तर साधकाने समजावे की, आपल्या अनेक जन्मांचे सुकृत फलद्रूप झाले आहे.  त्याचप्रमाणे रामा !  तू मला जो प्रश्न विचारलास यावरून मला समजते की, तुझे पूर्वसुकृत उदयाला आले आहे.  याचा मला खूप आनंद झाला आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ