Tuesday, April 26, 2022

स्वप्न व जागृतीमधील अनित्यता | Impermanence in Dream & Waking

 




साधकाने जागृतावस्था व स्वप्नावस्था या दोन अवस्थांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे.  जागृतावस्थेमधील अन्न-पाणी या विषयांनी स्वप्नावस्थेमधील भूक-तहान शांत होत नाही.  म्हणून जागृत विषयांची प्रयोजनता स्वप्नावस्थेमध्ये राहत नाही.  समजा, एखादा मनुष्य जागृतावस्थेमध्ये पोटभर अन्न ग्रहण करून, पाणी पिऊन, तृप्त होऊन झोपला असेल तरी स्वप्नावस्थेमध्ये तो भुकेने-तहानेने व्याकूळ होतो.  म्हणजेच जागृतीमधील अन्न-पाणी ही विषय स्वप्नामधील भूक-तहान शमविण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.  जागृतावस्थेत पोटभर अन्न ग्रहण करून झोपले तरी काही वेळेस मनुष्याला स्वप्नावस्थेमध्ये भुकेने व्याकूळ होण्याचा अनुभव येतो.  किंवा याउलट, स्वप्नामध्ये पंचपक्वान्नाचे जेवण करून तृप्त झालेला मनुष्य जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्याला प्रचंड भूक लागलेली असते.  भूक तहानेने तो व्याकूळ होतो.  तो अतृप्त असतो.  याप्रमाणे स्वप्नामध्ये जागृतीमधील पदार्थांचा विपरीत भाव दिसतो.

 

याचा अर्थ जागृतावस्थेमधील पदार्थ जागृतीत जरी सत्य वाटले तरी स्वप्नामध्ये क्षुधा-तृषा-गमनागमन आदि व्यवहारासाठी त्यांचा उपयोग होत नाहीत.  तसेच, स्वप्नामधील पदार्थ जागृतावस्थेमध्ये उपयोगी पडत नाही.  स्वप्नामध्ये लॉटरी लागली तर जागृतावस्थेमध्ये पैसे मिळत नाहीत.  यावरून सिद्ध होते की, स्वप्नामधील विषय जितके मिथ्या आहेत, तितकेच जागृतीमधील विषयही मिथ्या आहेत.  यामध्ये शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही.  जागृतावस्थेमधील विषय हे मिथ्याच आहेत, हे स्पष्ट आहे.

 

म्हणून स्वप्नावस्था व जागृतावस्था या दोन्हीही अवस्थांच्यामध्ये अनुभवायला येणारे सर्वच विषय हे आदिअंतयुक्त, उत्पत्तिस्थितिलययुक्त आहेत.  ही त्यांच्यामधील समानता आहे.  म्हणूनच या दोन्हीही अवस्थांच्यामधील सर्वच दृश्य विषय हे जन्ममरणयुक्त, नाशवान, अनित्य असून मिथ्या, असत्, वितथ स्वरूपाचे आहेत.  हेच येथे सिद्ध होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ