Tuesday, April 5, 2022

प्रयत्न-पराक्रमाने दैव ही घाबरेल | Fate Fears Effort

 



आपण स्वतः केलेला शास्त्रविहित प्रयत्न आणि अन्य कोणीतरी म्हणजे दैवाने केलेला पुरुषार्थ या दोघांमध्ये दोन एडक्यांप्रमाणे युद्ध चाललेले असते.  त्यामध्ये ज्याची शक्ति जास्त तोच जिंकतो.  श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, आपल्या जीवनामध्ये आपण जसा प्रयत्न-पुरुषार्थ करीत असतो, चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपले दैव सुद्धा आपल्या प्रयत्नांच्याबरोबर लढण्यासाठी, आपली परीक्षा पाहण्यासाठी तेथे येते.  आपल्या प्रयत्नांना शक्तिहीन करण्याचा प्रयत्न करते.  त्यामुळे प्रयत्न आणि दैव मनुष्यासमोर सारख्याच शक्तीने येतात.  एका बाजूला आहे पुरुषार्थ आणि दुसऱ्या बाजूला आहे दैव !

 

अशा वेळी विवेकी मनुष्य अथक प्रयत्न करून धैर्याने, दृढ विश्वासाने, उत्साहाने व सातत्याने प्रयत्न करून दैवाचा प्रभाव कमी करतो.  याउलट अविवेकी मनुष्य मात्र त्याच्यासमोर घोर दैव प्राप्त झाले असताना गोंधळून जातो.  त्याची बुद्धि भ्रमिष्ट होते.  त्यावेळी त्याला पुरुषार्थ दिसतच नाही.  आपण प्रयत्न करू शकतो, हे विसरून तो निष्क्रीय होऊन बसतो.  प्रयत्नांचा त्याग करून मनुष्य निष्क्रीय झाला की, त्याचे दैव आणखीनच बलवत्तर होते.

 

दैव समोर आले रे आले, एखादा वाईट प्रसंग, एखादे संकट आले की, आपण, "काय माझे नशीब ?"  असे म्हणून भयभीत होतो.  आपलेच दैव ज्यावेळेस आपली अशी अवस्था पाहते, त्यावेळेस ते दैव आपल्या मनावर अधिक प्रभाव गाजवते.  त्यामुळे मनुष्य हताश, निराश, उद्विग्न होतो.

 

दैव आणि पुरुषार्थ ज्यावेळेस आपल्यासमोर येतील, त्यावेळी आपण प्रयत्नांचे सामर्थ्य वाढविले तर आपल्याला दैवही घाबरेल.  रघुवंशामध्ये असे थोर राजे होऊन गेले की, त्यांच्यापुढे दैवही घाबरत होते.  ज्यावेळी शत्रूप्रमाणे संकटांशी मी दोन हात कारेन, दैवासमोर दुर्दम्य आत्मविश्वासाने मनुष्य उभा राहील, त्यावेळी संकटे सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात.  प्रत्यक्ष मृत्यु सुद्धा ज्ञानी पुरुषाला प्रणाम करतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ