Tuesday, October 12, 2021

ध्यान आणि मन | Dhyan And The Mind

 



ध्यानामध्ये मनाचे निरीक्षण करीत असताना काहीही चांगले नाही किंवा वाईटही नाही, कारण चांगले आणि वाईट या मनाने निर्माण केलेल्या चुकीच्या कल्पना आहेत.  कल्पनेनेच चांगले-वाईट विचार ठरविलेले आहेत तसेच कितीही चांगले विचार असले तरी ते जसे येतात तसे टिकविण्याचा प्रयत्न करून सुद्धा न राहाता आपोआप निघून जातात आणि वाईट विचार सुद्धा जातात.  हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे.

 

मग हे सत्य असताना विनाकारण ते विचार टिकविण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न का करावा?  त्यांना कोणत्याही प्रकारचे महत्व न देता, सत्यता न देता त्यांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे येऊ द्यावे आणि जाऊही द्यावे.  यातच मनाची पक्वता नाही का?  हा खरा पुरुषार्थ नाही का?  म्हणून ध्यान करताना साधकाने मनाचे निरीक्षण करताना मनाला कोणत्याही प्रकारची वास्तवता न देता अत्यंत तटस्थतेने अलिप्त राहून जाणीवपूर्वक सावधानतेने निरीक्षण करावे म्हणजेच चांगले विचार आले तर हुरळून जावू नये, वाईट आले तर खिन्न, नाराज होऊ नये.  ते जसे आहेत तसे पाहाण्याचा अभ्यास करावा.  निरीक्षकाचे काम फक्त निरीक्षण करणे आहे.  त्यावर प्रतिक्रिया करणे हे काम नाही.  याप्रमाणे साक्षित्वाचाअभयस करावा.

 

याचा परिणाम म्हणजे मनामधील सर्व काल्पनिक विषयांच्या वृत्ति, संकल्प-विकल्प, द्वंद्व, मनाची मनोराज्ये, सुख-दु:खांचे हेलकावे वगैरे कमी होतील.  वृत्तींचा प्रवाह आणि मनाची बहिर्मुख प्रवृत्ति कमी कमी होऊन मनाची उपशमा होईल.  मनाचे लक्ष मनामध्येच असल्यामुळे अंतरिक जाणीव आणि सावधानता अधिक वाढेल.  बाहेरील शब्द, स्पर्शादि विषयांच्या सवेंदना अंतरिक सावधानता विचलित करणार नाहीत, अस्वस्थ करणार नाहीत, त्या अवस्थेमध्ये मन संपूर्ण अंतरिक जाणीवेमध्ये एकाग्र झालेले असते.  त्यावेळी बाह्य विषय, इंद्रिये व शरीर यांची शरीराची जाणीव संपते.  मनामधील सर्व संकल्प आणि विकल्प गळून पडतात.  संकल्पप्रभवान्कामान्स्त्यक्त्वा सर्वानशेषतः |  ही अवस्था प्राप्त होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ