Thursday, January 7, 2021

रज्जुसर्पाचा विवेक | Rope-Snake Discrimination

 



ज्ञान हेच संसारनिवृत्तीचे यथायोग्य साधन आहे.  अन्य कोणतेही साधन नाही.  म्हणून जिज्ञासु साधकाने या मार्गामध्ये अन्य प्रमाणांचा विनाकारण शोध घेत बसू नये.  याचे कारण, जसे रज्जुसर्पाचा विवेक झाला की, त्याचवेळी रज्जुमधून सर्पाची निवृत्ति हे फल प्राप्त होताक्षणीच आपणास रज्जूचे ज्ञान होते.  आपण व्यवहारात ही गोष्ट अनेक वेळा अनुभवतो.  अंधुकशा प्रकाशात दोरी पडलेली असते.  ती पाहताक्षणी, हा साप आहे, असे आपल्याला वाटते.  ही कल्पना निर्माण होताक्षणीच आपल्या छातीत धस्स होते.  आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो.  सर्वांगाला घाम येतो.  आपण भीतिग्रस्त होतो.

 

त्यानंतर थोड्यावेळाने आपण त्या सापाचे निरीक्षण करायला लागतो.  खरच तो साप आहे की आणखी काही ?  निरखून काळजीपूर्वक पाहिले की, तो साप नाही.  हाच विवेकाचा उदय आहे.  या विवेकामुळे रज्जुमधील भासमान सर्पाची निवृत्ति होते.  हेच विवेकाचे फळ आहे.  सर्पभ्रमाची निवृत्ति झाली रे झाली की, आपोआपच अधिष्ठानाचे ज्ञान होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.  अध्यस्त वस्तूचा निरास होणे म्हणजेच अधिष्ठानाचे यथार्थ ज्ञान होणे होय.

 

त्याचप्रमाणे येथे अन्तःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, प्रज्ञानघन असे एकाच आत्म्याचे तीन विकल्प सांगितले.  या तिन्हीही अध्यस्त आत्म्यांचा निरास होणे म्हणजेच तुरीय आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे होय.  या अध्यासाचा निरास करण्यासाठी विवेकाची प्रक्रिया आवश्यक आहे.  तसेच ही विवेकप्रक्रिया स्वतःच्या बुद्धीने करावयाची नाही.  कारण आपली बुद्धि ही मर्यादित व रागद्वेषादि दोषांनी युक्त आहे.

 

म्हणून वेदांतशास्त्राच्या प्रमाणाच्या साहाय्यानेच साधकाने हा विवेक करावा.  वेदांतशास्त्रप्रमाणजनित विवेकाच्या साहाय्याने अध्यासाचा निरास केला की, अधिष्ठानभूत असणारे चतुर्थ, तुरीय, निर्विशेष, शुद्ध आत्मचैतन्यस्वरूप प्रकट होते.  

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ