Tuesday, August 27, 2019

अतींद्रिय आत्मसुखाचे बुद्धिग्रहण | Grasping Extra-Sensory Bliss




आत्मसुख हे अतींद्रिय आहे.  ते विषयांच्यावर अवलंबून नसल्यामुळे इंद्रिय व विषयांच्या सन्निकर्षामधून निर्माण झालेले नाही.  म्हणून ते निर्विषयक सुख आहे.  यासाठी इंद्रियांची किंवा विषयांची जरुरी नाही.  विषय नसले तरी आत्मसुखाचा अनुभव येऊ शकतो.  मग ते अतींद्रिय, निर्विषयक सुख कसे अनुभवाला येते ?  त्यासाठी साधन कोणते ?  यावर भगवान स्वतःच सांगतात की, आत्मसुख अतींद्रिय असले तरी ते बुद्धिग्राह्य आहे.  बुद्धीनेच ग्रहण करता येते.

परंतु श्रुति म्हणते –
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् |            (केन. उप. १-५)
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह |         (तैत्ति. उप. २-४-९)

जे स्वरूप मनाने चिंतन करता येत नाही, परंतु ज्याच्यामुळे मनाला चिंतन करण्याची शक्ति मिळते, ते स्वरूप मनाला आकलन होत नाही.  तसेच सर्व वाचा ही मनासहित त्याचे स्वरूप प्रकट न करता परत फिरते.  ते अवर्णनीय, अनाकलनीय, मनाच्या अतीत असणारे तत्त्व आहे.  तो निरतिशय आत्मसुखाचा अनुभव मनाने घेता येत नाही.  याचे कारण आपली बुद्धि विषयासक्त असल्यामुळे रागद्वेषांनी मलीन झालेली आहे.  अशा बहिर्मुख, अशुद्ध बुद्धीने आत्मस्वरूपाचे दर्शन घेता येत नाही.  यामुळे निरतिशय आत्मसुखाचा अनुभव येऊ शकत नाही.  त्यासाठी सूक्ष्म, शुद्ध आणि अंतर्मुख मनाची आवश्यकता आहे.  

श्रुति म्हणते –
एष सर्वेषु भूतेषु गूढोSत्मा न प्रकाशते |
दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः |           (कठ. उप. १-३-१)

अत्यंत सूक्ष्म आणि गूढ असलेला आत्मा सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये असूनही तो प्रकट होत नाही.  परंतु तत्त्वदर्शी मात्र अत्यंत शुद्ध आणि एकाग्र बुद्धीने आत्मस्वरूप पाहातात.  आत्मानुभूति घेतात.  याचा अर्थ अत्यंत शुद्ध, सूक्ष्म आणि अंतर्मुख बुद्धीने म्हणजे वृत्तीने आत्मसंतुष्टरूपी निरतिशय सुखाची अनुभूति येते.  त्यासाठीच साधकांनी प्रयत्न करावा.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ


No comments:

Post a Comment