Tuesday, July 16, 2019

दैन्यावस्थेचे महात्म्य | Importance of Humility




संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज लिहितात –
      संतत्व नाही कवित्वात संतत्व नाही मठात |  
      संतत्व नाही विद्वत्तेत तेथे स्वानुभव पाहिजे ||  
याप्रमाणे साधकाच्या अंतःकरणामध्ये तीव्र व्याकुळता हवी.  ही व्याकुळता प्राप्त करण्यासाठी मी भगवंताला, शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  काया-वाचा-मनसा त्याची सेवा करतो.  या सर्व सेवेचे फळ म्हणजेच दैन्यावस्थेची प्राप्ति !  म्हणूनच येथे म्हटले आहे – प्रणामो दैन्यलब्धये |  

भगवान नारदमहर्षि सुद्धा आपल्या गुरूंना व्याकूळ होऊन प्रार्थना करतात – “हे गुरो !  मी आज चौदा विद्या, चौसष्ठ कला यांमध्ये पारंगत आहे.  तरीही मी अत्यंत शोकाकुल आहे.  अगतिक होऊन तुला शरण आलेलो आहे.  तूच मला या शोकसागराच्या पार करून ने.”  या अवस्थेलाच व्याकुळता म्हणतात.  त्यावेळी साधकाचे मन फक्त परमशांतीसाठीच चातकाप्रमाणे आतुर होते.  अशी उत्कट भावावस्था प्राप्त करण्यासाठीच मी – नमः शिवाय |  ईश्वराला, शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  त्यासाठीच सेवा करतो.  

जसे, घराला चारही बाजूंनी आग लागली, आगीचा लोळ आपल्यापर्यंत आला, आपला कपडा पेटला, तर त्यावेळी आपण आपल्या सल्लागारांना सल्ले विचारात बसत नाही.  अन्य जीवनभर संग्रह केलेल्या वस्तु सांभाळत बसत नाही.  एकेका क्षणाने मृत्यु आपल्यावर झेपावत असतो.  हे जेव्हा दिसते, त्याचवेळी जीवनाची किंमत कळते.  सहज जगत असतो, तोपर्यंत जीवनाची किंमत कळत नाही.  आग लागल्यावर सर्व शक्तीने, व्याकुळतेने, तीव्र गतीने आपण पाण्याकडे धाव घेतो.  भगवंताच्या प्राप्तीसाठी अशीच व्याकुळता निर्माण झाली पाहिजे.  त्यासाठीच नमः शिवाय |  म्हणजे मी शिवाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.  

किंवा दैन्यं याचा दुसरा अर्थ होतो – ज्ञाप्तिः |  जो साधक निष्काम झालेला असून त्याच्या मनामध्ये प्रखर वैराग्य निर्माण झालेले आहे, तो सुद्धा नमः शिवाय |  - ज्ञाप्तिसिद्धये |  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी नमस्कार करतो.  ज्ञानप्राप्ति हेच साधकाचे अंतिम साध्य आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


No comments:

Post a Comment