Wednesday, January 16, 2019

शिक्षकांचे संस्कार | Role of Teachers’ Impressions




आधुनिक काळामध्ये विद्यार्थी अधिकाधिक वेळ शिक्षकांच्या सान्निध्यात असतात.  त्यामुळे विद्यार्थीदशेमध्ये असताना विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षकांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे.  शिक्षक हा उगवत्या तरुण पिढीचा आधारस्तंभ व मार्गदर्शक आहे.  संपूर्ण समाजाचा महत्वाचा घटक आहे.  मागची पिढी व तरुण पिढी यामधील शिक्षक हा दुवा आहे.  यामुळे पुस्तकी विद्येबरोबरच शिक्षकाने विद्यार्थ्याला व्यवहारज्ञान, जीवनाचे ज्ञान देणे आवश्यक ठरते.  

विद्यार्थ्याच्या मनावर आईवडिलांनी जे सुसंस्कारांचे बीज पेरले, त्याला खतपाणी घालून रक्षण, संगोपन करून त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करणे, हे शिक्षकाचे कर्तव्य आहे.  परंतु त्यासाठी प्रथम आजचा शिक्षक सुसंस्कारसंपन्न हवा.  शिक्षकाने आपल्या स्वतःच्याच आचारांच्यामधून, चारित्र्यसंपन्न जीवानामधून विद्यार्थ्याला संस्कारक्षम बनविले पाहिजे.  

ज्या मनुष्यावर आई-वडिल आणि आचार्य यांचे योग्य वेळी योग्य संस्कार होतात, तोच मनुष्य अंतरंगामधून विकसित, परिपक्व, सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न होतो.  त्याचे आचार-विचार-उच्चार उदात्त होतात.  श्रुति म्हणते – मातृमान् पितृमान् आचार्यवान् पुरुषो वेद |  ज्याच्यावर माता-पिता-आचार्य यांचे संस्कार होतात, त्याचेच जीवन परिपूर्ण होते.  याउलट संस्कारहीन पुरुष स्वैर, उच्छृंखल, भोगासक्त होऊन पशुतुल्य जीवन जगतो.  तो पुरुष कामनांच्या, वासनांच्या व विकाराच्या आहारी जाऊन अधःपतित होतो.  

वस्तुतः आईवडिल व गुरूंचे चांगले संस्कार झाले असतील तर त्या मनुष्याला – तू चांगले वाग, असे शिकविण्याची आवश्यकताच नाही.  परंतु सद्य समाजात सतत – संस्कार करा, संस्कार करा, असा डांगोरा पिटविला जातो.  आईवडिल व आचार्य (शिक्षक) यांनी आपल्या स्वतःच्याच आचरणामधून हे संस्कार पुढच्या पिढीमध्ये हळूवारपणे, कोणत्याही प्रकारची लेक्चरबाजी न करता, उपदेशाचे मोठमोठे डोस न पाजता उतरविले पाहिजेत.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011




- हरी ॐ




No comments:

Post a Comment