Tuesday, August 21, 2018

नात्यांची अनित्यता | Impermanence of Relations




परिवारामध्ये स्वतःच्या कुटुंबामधील पति-पत्नी, मुले, नातेवाईक, सगेसोयरे, आप्त, बंधु-बांधव, मित्र असे सर्वचजण असतात.  यामधील काही रक्ताची नाती असतात, तर काही मनाने मानलेली नाती असतात.  मनुष्य या सर्वांना माझे-माझे म्हणून मनाने घट्ट पकडतो.  त्यांच्यामध्ये ममत्व निर्माण करतो. प्रेम, स्नेह, आसक्तीने बद्ध होतो.  ती माणसेही सतत जवळ, सान्निध्यात असतात.  आपल्याभोवती फिरतात.  मनुष्याच्या सर्व आज्ञा शिरसावंद्य मानतात.  

हा माझा परिवार आहे.  माझ्यासाठी हे सर्वजण काहीही करू शकतात.  अशा अनेक प्रकारच्या कल्पना मनुष्य करतो.  ममत्वामुळे मनुष्य या सर्वांच्यामध्ये बद्ध होतो.  परंतु हे कुठपर्यंत ?  जोपर्यंत मनुष्यामध्ये धन मिळविण्याची शक्ति आहे, तोपर्यंतच माणसे आपल्याभोवती फिरतात.  हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  जोपर्यंत आपल्याजवळ पैसा, ऐश्वर्य, सत्ता, प्रसिद्धि आहे व जोपर्यंत आपण लोकांच्या कामना पूर्ण करतोय, तोपर्यंतच सर्वजण आपल्याजवळ राहतात.  

परंतु जीवनात सतत चढ-उतार येतच असतात.  निसर्गनियमाप्रमाणे आपले शरीरही एकेका दिवसाने वृद्ध होत असते.  इंद्रियांच्यामधील शक्ति, कार्यक्षमता क्षीण होते.  बुद्धिची शक्ति सुद्धा कमी-कमी होते.  हे सत्य डावलता येत नाही.  आपले जीवन हळुहळू पूर्णतः परावलंबी होते.  अशा वेळी आपल्याभोवती असणारी माणसे आपल्यापासून हळुहळू दूर जायला लागतात.  काहीना काहीतरी निमित्त सांगून आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात.  घरामधील माणसे म्हणजे स्वतःची पत्नी असो, पुत्र असो, सर्वजण दोन दिवस, चार दिवस आपल्याजवळ बसतात.  नंतर सर्वजण कारणे सांगून निघून जातात.  

अशा प्रकारे माणसे आपला निरुपयोगी म्हणून त्याग करतात.  आपण आजारी पडलो, अत्यवस्थ झालो तर आपल्या प्रॅापर्टीसाठी मात्र आपल्याजवळ येतील.  विचारपूस करतील, काळजी घेण्याचे नाटक करतील.  परंतु जेव्हा त्यांना स्वतःचा लभ्यांश दिसत नाही, तेव्हा मात्र तीच जवळची माणसे आपल्याला सोडून जातात.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ


No comments:

Post a Comment