Tuesday, July 24, 2018

दक्षता आणि काम-क्रोध | Alertness to Manage Desire-Anger




भगवान म्हणतात –
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ||       (गीता अ. ३-३७)
हे अर्जुना !  राजोगुणापासून निर्माण होणारा काम हाच क्रोध असून तो महाखादाड व महापापी आहे.  या विश्वामध्ये ‘काम’ हाच साधकाचा शत्रु आहे, असे तू जाण.  

यामुळे प्रत्येक साधकाने कामक्रोधरहित होणे अत्यंत आवश्यक आहे, हेच पुन्हा पुन्हा भगवान सूचित करतात.  पुन्हा पुन्हा सांगूनही याचे विस्मरण होते.  आपल्या अंतःकरणामधील कामक्रोधादि दोषांकडे साधकाचे दुर्लक्ष होते.  परंतु अशा कामक्रोधयुक्त कलुषित मनाने शास्त्राचे कितीही अध्ययन केले तरीही ते फलदायी ठरत नाही.  अशा केवळ शाब्दिक ज्ञानाने अंतरिक शांति, आनंद प्राप्त होत नाही.  म्हणूनच संपूर्ण गीतेमध्ये आणि सर्व शास्त्रामध्येही अंतःकरणशुद्धीला अत्यंत महत्व दिलेले आहे.  आपल्या अंतरिक दोषांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.  याउलट हे सर्व दोष साधकाने अत्यंत जाणीवपूर्वक अभ्यासाने काढून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे.  

अशा प्रकारे ज्या साधकांनी प्रयत्नाने कामक्रोधांवर विजय मिळवलेला आहे, त्यांचे मन त्यांच्या स्वाधीन झालेले असते.  साधन करीत असताना ते अत्यंत दक्ष, सावधान असतात.  भगवान सांगतात – कूर्मोङ्गानीव सर्वशः |  ज्याप्रमाणे समोर एखादा अडथळा दिसल्यानंतर कासव आपले अवयव लगेचच कठीण कवचाखाली ठेवते आणि तो अडथळा संपल्यानंतर पुन्हा ते अवयव बाहेर काढून पाण्यामध्ये मुक्त विहार करते, त्याप्रमाणेच हा विवेकी साधक अत्यंत दक्ष राहातो.  प्रसंग घडत असताना मनामध्ये कामक्रोध निर्माण होतील असे दिसताच त्यांच्यावर नियमन करतो.  यामुळे त्याचे मन हळूहळू कामक्रोधाच्या आवेगापासून निवृत्त होते.  म्हणूनच ‘दक्षता’ हा साधकाचा महत्वाचा गुण आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002





- हरी ॐ – 

No comments:

Post a Comment