Tuesday, July 17, 2018

आत्मज्ञांची सुखप्राप्ति | Achievements of the Self-Realized





विदितात्मनाम्” म्हणजेच आत्मज्ञ होय.  त्यांनी ब्रह्मस्वरूप हे माझेच प्रत्यगात्मस्वरूप आहे, हे निश्चितपणे जाणलेले आहे.  त्यामुळे “ब्रह्म एव सत्यम् | अन्यत् सर्वं मिथ्या इति |ही अद्वैताची पारमार्थिक दृष्टि त्यांना प्राप्त झालेली असते.  असे पारमार्थिक तत्त्व जाणणारे ब्रह्मज्ञानी यति दोन्हीही प्रकारचे सुख प्राप्त करतात.  

(१) जीवद्दशायाम् जिवंत असतानाच याच शरीरामध्ये ते यति ब्रह्मानंदाची अनुभूति घेतात.  त्यांचा आनंद बाह्य विषयांच्यावर अवलंबून नसून सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद त्यांना प्राप्त होतो.  या निरतिशय आनंदाच्या प्राप्तीमुळे ते पूर्ण, तृप्त, आनंदस्वरूपच होतात.  यामुळे त्यांच्या मनामधील सर्व कामना गळून पडतात.  भगवान अशा आत्मतृप्त पुरुषाचे वर्णन करतात -
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् |
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ||       (गीता अ. २-५५)
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः |
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते || (गीता अ. ३-१७)
याप्रकारे जीवन जगत असतानाच ते ब्रह्मानंदाची परमोच्च अवस्था, जीवन-मुक्तावस्था प्राप्त करतात.

(२) विदेहदशायाम् शरीर पडल्यानंतर शरीररहित असणारी निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाची विदेहकैवल्यावस्था ते प्राप्त करतात.  हे शरीर पडल्यानंतर ते पुन्हा कधीही या जन्ममृत्युयुक्त संसारामध्ये येत नाहीत.  भगवान म्हणतात –
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम |           (गीत अ. १५-६)

या सर्व विवेचनावरून सिद्ध होते की, प्रत्येक साधकाने प्रथम विक्षेपला कारण असणाऱ्या कामक्रोधापासून निवृत्त व्हावे.  अंतःकरणाची शुद्धि प्राप्त करून नित्यनिरंतर समाधिअभ्यास करावा.  यामुळे निःसंशय, यथार्थ, सम्यक ज्ञानाची प्राप्ति होवून त्यामध्ये निष्ठा प्राप्त होईल आणि या ज्ञाननिष्ठेचे फळ म्हणजेच निरतिशय आनंदाची अर्थात मोक्षप्राप्ति होईल.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ – 

No comments:

Post a Comment