Tuesday, May 22, 2018

क्षान्ति | Forgiveness




व्यवहारामध्ये जोपर्यंत आपल्याला कोणी त्रास देत नाही, तोपर्यंत आपण सर्वांशीच चांगले वागतो.  परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ति आपल्याला त्रास देते, आपल्याशी वाईट पद्धतीने वागते, त्यावेळी आपण जशास तसे न वागता त्या व्यक्तीला क्षमा करणे म्हणजेच “क्षान्ति” म्हणजेच सहनशीलता, सहिष्णुता होय.  

एखाद्या व्यक्तीला क्षमा करायची म्हणजे नेमके काय करायचे ?  जीवन जगत असताना आपला अनेक व्यक्तींशी सतत संबंध येत असतो.  त्या अनुषंगाने सतत चांगले-वाईट, काही सुखकारक तर काही दुःखकारक असे प्रसंग घडत असतात.  आपण सतत कोणत्या ना कोणत्यातरी प्रसंगामध्ये असतो. जीवन म्हणजेच प्रसंगांची अखंड मालिका आहे.  प्रत्येक प्रसंग हा अटळ, अपरिहार्य असेल तर पुरुषार्थ कोणता ?  कितीही प्रयत्न केले, स्थान बदलले, घरातून अरण्यात गेलो तरी तिथेही अन्य व्यक्ति असतातच.  त्यामुळे तेथेही चांगले-वाईट प्रसंग निर्माण होतातच.  हे निर्विवाद सत्य आहे.  कोणताही प्रसंग आपण टाळू शकत नाही. थांबवू शकत नाही. अथवा बदलू शकत नाही.  

आपल्या जीवनात ज्यावेळी चांगले प्रसंग येतात, त्यावेळी आपण त्याचे सर्व कर्तृत्व स्वतःकडे घेतो.  मात्र ज्यावेळी दुःखाचे प्रसंग, वाईट, प्रतिकूल परिस्थिति निर्माण होते, त्यावेळी आपले मन निराश, उद्विग्न होते.  आपण दुसऱ्यालाच दोष देतो.  आपले नातेवाईक, बांधव, अन्य लोक अथवा स्वतःचे गुरु, आकाशामधील शनि वगैरेदि सर्वांनाच दोषी ठरवितो.  परमेश्वरावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  आत्मविश्वास संपतो.  धैर्य खचते.  जीवनाची दुर्दशा होते.  

वास्तविक पाहाता परमेश्वराने आपल्याला इतके सुंदर विश्व बहाल केलेले आहे.  परंतु आपल्या मनातच आनंद नसल्यामुळे विश्वामधील आनंदाचा आस्वाद घेता येत नाही.  क्षुल्लक गोष्टींसाठी आपण इतके निराश, उद्विग्न होत असू तर असे सतत खचणारे (upset होणारे) मन साधनेमध्ये तल्लीन होऊ शकत नाही.  मी कशाला महत्त्व द्यावे ?  There are better things to think and to do.  यासाठीच साधकाने “क्षान्ति” म्हणजेच “तितिक्षा” हा गुण आत्मसात करावा.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ – 

No comments:

Post a Comment