Tuesday, September 12, 2017

भिक्षेसाठी कुणाकडे जावे ? | Whom to Ask for Food ?


संन्याश्याने भिक्षेसाठी कुणाकडे जावे ?  केवळ एक उपचार या भावनेने भिक्षेसाठी बोलावणाऱ्याकडे जाऊ नये.  गृहस्थाश्रमी गृहिणीला चिन्ता, दुःख, त्रास देऊन भिक्षेला जाणे वर्ज्य करावे.  अशा ठिकाणी नमस्कार करून निघून जावे.  भिक्षेला जाण्यात गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेद नाही.  भिक्षा हा भाव आहे.  “अगत्वा खलमन्दिरम् | दुष्टाचारी, कपटी, क्रूर लोकांकडे भिक्षेसाठी कधीही जाऊ नये.  तसेचअक्लेशयित्वा चात्मानम् |  संन्याश्याने स्वतःच्या शरीराला क्लेश देऊन म्हणजे अघोरी तपस् करून, इतरांचे लक्ष वेधून, सहानुभूति मिळवून उदरनिर्वाह करू नये.  सहजपणे, कोणालाही त्रास न देता, दुष्टांशी व्यवहार न करता मिळणाऱ्या थोड्या अन्नात संन्याश्याने समाधान मानावे.  “यद् अल्पं तदपि बहुः |  जे मिळते ते अल्प असले तरी ते फार मोठे आहे, कारण त्यात संतोष आहे.  

दुसऱ्याला देताना तुम्ही काय देता व किती देता याला महत्व नसून कोणत्या भावाने देता याला फार महत्व आहे.  श्रद्धा, भक्ति, प्रेम व सेवावृत्ति दात्याच्या भूमिकेला आवश्यक आहेत.  गडगंज संपत्ति व खूप स्वादिष्ट अन्न असूनही जिव्हाळा व आपुलकी त्या अन्न देण्यात नसेल, तर व्यवहारातही कुणाला अन्न सेवन करावेसे वाटणार नाही.  अन्नपदार्थ वाढताना गृहिणीचा राग, वैताग, आदळआपट नसावी.  श्रद्धावान, भक्तियुक्त अंतःकरण व सदाचार असणाऱ्या व्यक्तीकडूनच साधुने भिक्षा स्वीकारावी.  खरोखरीच अंतरीच्या प्रेमाने दिले तर पोट भरले असूनही पोटात आपोआप जागा होते.  

जिज्ञासु साधकाने घरोघर जाऊन भिक्षा मागावी व परमेश्वराला आणि गुरूंना प्रथम ती भिक्षा अर्पण करून, परमेश्वराचा प्रसाद म्हणून तिचे सेवन करावे.  अशा सात्विक आहाराने, भिक्षेने साधकाचे शरीर शुद्ध होते, मनही शुद्ध होते. मन व इंद्रिये प्रसन्न राहतात.  अन्नसेवन करतानाही त्याच्या मनाची प्रसन्नता रहाते, मन आनंदी रहाते.  अशा प्रकारे अन्नाच्या साहाय्याने सुदृढ व स्वस्थ शरीराने क्रमाक्रमाने साधना करून साधकाने स्वतःचे उत्क्रमण करून घ्यावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ


No comments:

Post a Comment