Tuesday, January 24, 2017

भगवान कार्मानुष्ठान सांगतात | God Advocates Action


मी कर्म करण्यामध्येच मानवजातीचे कल्याण आहे.
लोकेSस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ |

सत्त्वगुणी, सदाचारी, विवेकी, चिंतनशील लोक फारच थोडे आहेत. याउलट, रजोगुण आणि तमोगुणप्रधान अधिक आहेत. अशा लोकांना – संन्यस्य श्रवणं कुर्यात् | या न्यायाने सर्वकर्मसन्यास करून शास्त्रश्रवण करण्याचा आदेश दिला तर त्यांचा महाभयंकर विनाश होईल. त्यांचे अधःपतन होईल, कारण ते जरी साधक असतील तरीही ज्ञानाचे अधिकारी नाहीत.

मनाची पक्वता नसताना किंवा अधिकारी नसताना त्यांनी कर्मत्याग करून शास्त्राभ्यास केला तर तो कर्मत्याग त्यांना निश्चितच फलदायी ठरणार नाही. म्हणून हे सर्व मंद-मध्यम साधक कर्मसंन्यासाचे अधिकारी नसून कर्माचेच अधिकारी आहेत. त्यांना कार्मानुष्ठान हेच उत्कर्षाचे तसेच चित्तशुद्धीचे साधन आहे, हे शिकविण्यासाठीच मला कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.

अवतारकार्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा संघर्ष, विरोध, प्रतिकूल परिस्थिति आली तरी सुद्धा मी कधीही सदाचार आणि धर्माचरण सोडीत नाही. उलट, कर्मयोग हाच उन्नतीचा मार्ग आहे, हे दाखविण्यासाठी तसेच लोकसंग्रह आणि लोकहितासाठी मी अविश्रांतपणे कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो.

मी स्वतः या जीवांच्या रूपाने जन्माला आलेलो असल्यामुळे माझ्यापासून दूर गेलेल्या माझ्या प्रजेला भावसागरामधून बाहेर काढून त्यांना पुन्हा आत्मस्वरूपाची शांति आणि आनंद देणे हे माझे परमकर्तव्य आहे. म्हणून, हे अर्जुना ! मी अविश्रांत कर्मरत असतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment