Tuesday, December 20, 2016

परमेश्वराच्या अवताराचे प्रयोजन | Purpose of God’s Incarnation


शरीराने, वाचेने आणि मनाने संपूर्ण शास्त्रनिषिद्ध कर्मे करतात ते पापी, दुष्ट पुरुष आहेत.  जगाच्या नाशालाच ते जन्मलेले असल्यामुळे अशा उन्मत्त, अहंकारी, स्वैर दुष्टांचा संहार करून विश्वामध्ये पुन्हा धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.  अधर्माचा उच्छेद करून म्हणजे अधार्मिक, स्वैर, हिंसाचारी असलेल्या दुष्ट पुरुषांचा नाश करून अभ्युदय-निःश्रेयस प्राप्तीचे साधन असलेल्या धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.

सर्व अधिकारी, श्रद्धावान लोकांनी शास्त्रप्रतिपादित कर्मांचे नियमाने अनुष्ठान करणे म्हणजे धर्मसंस्थापना होय.  हा परमेश्वराचा अवतार प्रत्येक युगामध्ये म्हणजेच ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्यावेळी होतो.  तसेच परमेश्वर स्वतःच योगमायेच्या साहाय्याने त्यावेळी योग्य शरीर निर्माण करून सगुण साकार रूपाला प्राप्त होतो. हाच परमेश्वराचा अवतार होय.

या अवताराची तीन प्रयोजने आहेत.  १. साधूंचे रक्षण, २. दुष्टांचा संहार आणि ३. धर्मसंस्थापना
तो हे कशासाठी करतो ?  याचे कारण यज्ञयागादि कर्मानुष्ठानाने सर्व देव संतुष्ट होतात.  मनुष्य यज्ञयागादि कर्मांच्यामध्ये देवतांचा हविर्भाग देऊन देवतांना संतुष्ट करतात.  देवता संतुष्ट झाल्या की, त्यांच्या कृपेने योग्य वेळी आवश्यकतेनुसार पर्जन्यवृष्टि होते आणि त्यामुळे धान्यसमृद्धि होते व सर्व प्राणिमात्रांचे जीवन सुकर होते.

याप्रमाणे धर्माच्या रक्षणानेच सर्व विश्वाचे रक्षण होते.  विश्वामध्ये सुस्थिति निर्माण होते.  उत्कर्ष, अभ्युदय होऊन जीवन सुखी होते.  म्हणून धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे.  यासाठीच परमेश्वर अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment