Tuesday, December 13, 2016

ब्रह्मज्ञानी तृप्त का असतो ? | Why Self-Realized is Complete?


ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाने तृप्त असतो.  व्यवहारामध्ये आपण बघतो की, मनुष्य एखाद्या वस्तूच्या प्राप्तीने तृप्त झाला तरी त्याला अन्य वस्तूंची इच्छा असतेच.  तसेच ब्रह्मज्ञानी पुरुषाला आत्मतृप्ति प्राप्त झाली तरी अन्य विषय मिळवायला काय हरकत आहे ?  परंतु ही आत्मतृप्ति बाह्य विषयांच्या प्राप्तीमधून झालेली नसून स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक अवस्था आहे.  त्यामुळे ती केवळ अनुभूति नसून तो ब्रह्मज्ञानी पुरुषाचा स्वभाव असतो.  ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर अन्य कोणताही मोठा लाभ शिल्लक राहात नाही, कारण सर्व निःसार, निःसत्त्व होते.

योगक्रियेने प्राप्त होणाऱ्या आकाशामधून गमन करणे, अणिमा, गणिमा वगैरेदि सिद्धींची तो अपेक्षा करीत नाही.  या सर्व सिद्धि मायिक असल्यामुळे संसारांतर्गत आहे.  त्यामुळे या सिद्धि मोक्षाचे साधन नसून संसारामध्येच अडकविणाऱ्या आहेत.  म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष सिद्धींची अपेक्षा करीत नाही.  काही लोकांना मृत्यूनंतर उर्ध्वगति मिळून देवपदवी मिळावी ही इच्छा असते.  परंतु या कशाचाही मोह त्याला नसतो, कारण तो आत्मस्वरूपाने सर्व विश्वाचा आत्मा झाल्यामुळे ब्रह्माविष्णुमहेशादि इंद्र, वरुणादि देवतांचा सुद्धा आत्मस्वरूप झालेला असतो.  ‘मी’ च विश्वस्वरूप आहे, ही त्याची अनुभूति असते.

तो स्वतःच जीवन्मुक्तावस्था अनुभवत असल्यामुळे श्रौतस्मार्तादि कार्मामधून प्राप्त होणारी चित्तशुद्धि व त्याद्वारे प्राप्त होणारा मोक्ष याची सुद्धा त्याला इच्छा नसते.  जो बद्ध आहे त्याला मोक्ष हवा असतो.  परंतु ‘मी’ नित्यमुक्त असल्यामुळे ‘मी’ ला कोणीही बंधन घालू शकत नाही.  ‘मी’ सर्वव्यापी असल्यामुळे परिपूर्ण आहे.  ‘मी’ तृप्त आहे.  यामुळे काहीही मिळवायचे प्रयोजन नसल्यामुळे कशाचीही इच्छा राहात नाही, अपेक्षा नाही, कारण आत्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व मायान्तर्गत आहे.  म्हणून मिथ्या आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment