Tuesday, October 4, 2016

ब्रह्मप्राप्ति निरतिशय कशी असेल ? | Can Self-Realization be Absolute ?


ब्रह्मज्ञानी पुरुषाने ब्रह्मप्राप्ति केली तरीही या देहामध्ये राहात असल्याने देहेन्द्रिये वगैरेंशी तादात्म्य पावून ‘मी स्थूल आहे’, ‘मी कृश आहे’, ‘मी बहिरा आहे’, ‘मी भुकेलेला आहे’ वगैरे अनुभव येतच असतात.  या अनुभवांमध्ये मर्यादा, परिच्छिन्नत्व, दुःख, यातना, विकार या सर्व अनात्मधर्मांचा अनुभव येतो.  यामुळे ती ब्रह्मप्राप्ति निरतिशय स्वरूपाची कशी असेल ?

अनात्म्याचे अनुभव येणे हा काही दोष नाही कारण देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार हा सर्व कार्यकारणसंघात असून स्वतः तो जड आहे.  त्यांचा अनुभव येताना ‘मी शरीर आहे’ असा येत नसून मम इदं शरीरम् |’ ‘हे माझे शरीर आहे’ असाच येत असतो.  म्हणजेच हा देहेन्द्रियादि संघात ‘इदं’ या प्रत्ययाचा विषय आहे.  

घटवत् |’  घटाप्रमाणे हा संघातही दृश्य असून अनात्मस्वरूप आहे.  घटद्रष्टा घटात् भिन्नः |या न्यायाने कार्यकारणसंघाताचा द्रष्टा तो संघातापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचा, संघाताच्याही अतीत असणारा आहे.  तो या संघाताचा एक अवयव किंवा भाग नसून भिन्न असून नित्य चैतन्यस्वरूप आहे.  तोच सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये स्वयंसिद्ध स्वरूपाने सन्निविष्ट असून ‘अहं’ ‘अहं’ या प्रत्ययाने सतत अनुभवाला येतो.  तोच आपले आत्मस्वरूप असून, ‘अहं’ प्रत्ययाचा विषय आहे.  म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष वर्तमान देहामध्ये राहात असला तरीही त्याची दृष्टि आत्मस्वरूपाची असते.

नवद्वारयुक्त शरीररूपी नगरामध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून, आपले मन संयमित करणारा पुरुष निःसंदेहपणे काहीही न करता आणि करविता अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहातो.
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् |
मी यत्किंचितही कर्म करीत नाही.’  ही तत्त्ववित् पुरुषाची दृष्टि असते. म्हणून उपाधीचे गुणधर्म, दोष, विकार स्वस्वरूपाला परिच्छिन्न करीत नाहीत, लिप्त करीत नाहीत, विकार करीत नाहीत.  तो उपाधीत असूनही स्वतः अपरिच्छिन्न, अविकारी, अस्पर्शित, पूर्ण स्वरूपाने राहातो.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012




- हरी ॐ

No comments:

Post a Comment