Tuesday, September 27, 2016

इंजिन बंद करणे ! | Turning Off the Engine !


न बाणो वेगे अक्षीणे स्वयं पतति, क्षीणे च वेगे स्वयमेव पतति |  तथा प्रारब्धं कर्मापि |   ज्याप्रमाणे गतिमान असणाऱ्या बाणावर कोणीही नियमन करू शकत नाही.  जोपर्यंत गति आहे तोपर्यंत तो त्याला गति दिलेल्या दिशेनच तसाच ‘सूं सूं’ करीत जातो आणि गति संपल्यानंतर आपोआपच खाली पडतो.  त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते.

त्याप्रमाणे शरीराला प्रारब्धाने गति आणि दिशा दिलेली आहे. त्यात कोणताही बदल करता येणार नाही.  तो मनुष्याचा पुरुषार्थ नाही.  पुरुषार्थ जर असेल तर, तो म्हणजे शरीररूपी गाडीचे इंजिन बंद करणे !  अज्ञानी मनुष्य या इंजिनमध्ये सतत स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक विषयरूपी वासनांचे पेट्रोल भरत असतो आणि त्यामुळे तो सतत अव्याहतपणे जन्मामागून जन्म घेत राहातो.

याउलट विवेकी पुरुष अखंड निष्काम सेवेने चित्तशुद्धि करून घेतो.  गुरूंच्या कृपेने आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून सर्व वासनांचे कारण असणाऱ्या अज्ञानाचा ध्वंस करतो.  संसारगाडीचे इंजिनच बंद करतो.  परंतु इंजिन बंद केले तरीही बंद करण्यापूर्वी दिलेल्या गतीमुळे गाडी काही काळ पुढे जात राहाते, व गति संपल्यावर आपोआपच थांबते.

त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने जरी संसाराचे कारण अज्ञान ध्वंस झाले, तरी प्रारब्धाने गति दिल्यामुळे ज्ञानानंतरही शरीर तसेच राहाते आणि प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर देहपातानंतर तो निरुपाधिक ब्रह्मस्वरूप होतो.  श्रुति म्हणते – ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति |  त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

No comments:

Post a Comment