Tuesday, October 18, 2016

“सूर्य निर्माण करणे” हा पुरुषार्थ नाही | “Creating the Sun” is not our Aim



सर्व जीवांची दृष्टि अज्ञानरूपी पटलाने लांछित झालेली असल्यामुळे ते स्वयंप्रकाशमान चैतन्यस्वरूप असूनही दिसत नाही, प्रचीतीला येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  ज्याप्रमाणे एखादा अंध मनुष्य चक्क सूर्यप्रकाशात उभा असूनही, सूर्याच्या प्रकाशाची उष्णता अनुभवूनही सूर्यप्रकाश प्रत्यक्ष पाहू शकत नाही.

सूर्य स्वयंप्रकाशित, तेजस्वी, प्रकाशस्वरूप आहे.  परंतु जर आपण कृष्णमेघाच्या उपाधीमधून पाहिले तर तोच सूर्य आपल्याला तेजोहीन, निष्प्रभ, काळवंडलेला दिसतो.  हा दोष सूर्याचा नसून आपल्या दृष्टीचा आहे.  सूर्य कधीही तेजोहीन नाही.  तो नित्य प्रकाशस्वरूप आहे.  त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशमान आत्मस्वरूपावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे ‘मी’ ‘मला’ यथार्थ स्वरूपाने जाणू शकत नाही.

दृष्टांतामध्ये ‘सूर्य निर्माण करणे’ हा पुरुषार्थ नसून आपल्या डोळ्यावरील आवरण दूर करणे हा आहे, कारण सूर्य नित्य प्रकाशस्वरूप असल्यामुळे आवरण दूर केले की, आपल्याला सूर्याचे साक्षात दर्शन होते.  किंवा शेवाळ्याखाली शुद्ध आणि निर्मळ पाणी असतेच.  परंतु शेवाळ्याच्या आवरणामुळे ते दिसत नाही.  म्हणून ‘पाणी निर्माण करणे’ हा पुरुषार्थ नसून, शेवाळे बाजूला करणे हा पुरुषार्थ आहे.

त्याचप्रमाणे जीवनाचा पुरुषार्थ कोणता ?  अनात्म वस्तूंचे चिंतन करणे हा पुरुषार्थ नाही.  तर शास्त्रकार सांगतात – आत्मकल्याणं एव कर्तव्यम् |  या मनुष्यशरीरामध्येच जीवन परिपूर्ण करणे हेच आत्मकल्याण आहे.  मानवाला अत्यंत दुर्लभ अशी विवेकबुद्धि दिलेली आहे.  मानवाने याच दुर्लभ नरदेहामध्ये आत्मकल्याण करून घेण्यासाठी अन्य सर्व अनात्मवस्तूंचे चिंतन करण्याऐवजी आत्मस्वरूपाचे अखंड चिंतन करावे, कारण बाह्य विषयांचे चिंतन केल्याने मन बहिर्मुख, विषयाभिमुख होऊन मनुष्याचे क्रमाने अधःपतन होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

No comments:

Post a Comment