Saturday, August 27, 2016

विवेकजन्य वैराग्य | Rational Renunciation


अनेक वर्षानुवर्षे नव्हे जन्मानुजन्म पुन्हा पुन्हा विषय उपभोगून जेव्हा वाट्याला दुःखच येते आणि जीवनामध्ये सुखाचा लेशमात्र किरण सुद्धा दिसत नाही, तेव्हा मनुष्य आपोआपच विषयांच्यापासून निवृत्त होतो.  या विश्वात आणि विषय उपभोगामध्ये काही अर्थ नाही, हे त्याला मनोमन पटते.  त्यामुळे त्याच्या मनामध्ये जीवनाविषयी नैराश्य आणि वैफल्य निर्माण होते.  आता काहीही नको अशी त्याची वृत्ति होते.  कशातच रस वाटत नाही.

परंतु ही अवस्था प्रसंगानुरूप निर्माण झालेली असल्यामुळे हे तात्कालिक वैराग्य आहे.  स्मशान वैराग्य आहे.  ते विवेकशून्य वैराग्य आहे.  असे निराश, उदास झालेले मन साधनेमध्ये एकाग्र होत नाही, काळाच्या ओघामध्ये परिस्थिति बदलली की मनुष्य दुःख, यातना विसरून पुन्हा विषयामध्येच रममाण होतो.  म्हणून या वैराग्यामुळे कधीही ज्ञाननिष्ठा किंवा श्रावणादि साधनेमधील निष्ठाही मिळत नाही.

म्हणून येथे भाष्यकार सांगतात दृढ वैराग्यप्राप्तीसाठी प्रथम गुरूंच्या मुखामधून विषयांचे जे खरे स्वरूप आहे त्याचे श्रावण करून विषयदोषदर्शन करावे आणि विवेकाने जाणीवपूर्वक विषयांच्या पासून म्हणजेच विषयासक्तीपासून मनाला निवृत्त करावे.  गुरु शिष्याला श्रुति, युक्ति आणि अनुभूति यांच्या साहाय्याने विषयांची मीमांसा करून विश्वाचे आणि विषयांचे खरे स्वरूप प्रकट करतात.  ज्याप्रमाणे कार्मामधून प्राप्त होणाऱ्या इहलोकातील उपभोगांचा क्षय होतो, त्याचप्रमाणे पुण्यकर्मामधून प्राप्त होणाऱ्या स्वर्गलोकामधील उपभोगांचा सुद्धा क्षय होतो.  म्हणजेच इहलोक आणि स्वर्गलोक हे दोन्हीही कर्मजन्य असल्यामुळे नाशवान, अनित्य स्वरूपाचेच आहेत.

इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग निःशंशय दुःखाचेच कारण होतात आणि ते आदि व अंत असणारे असल्यामुळे अनित्य आहेत.  बुद्धिवान विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

No comments:

Post a Comment