Tuesday, August 9, 2016

ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी | Attitude of Realized Soul




प्रारब्धकर्माचे फळ उपभोगत असताना ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी कशी असते ?
आगते स्वागतं कुर्यात्  - जीवन जगत असताना जे काही चांगले वाईट आपल्या वाट्यास येईल, त्याचा आनंदाने स्वीकार करतो.
आगमापायिनोSनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत | या भगवंताच्या उक्तीप्रमाणे सर्वच सुख आणि दुःखात्मक प्रसंग तात्कालिक, अनित्य स्वरूपाचे आहेत.  त्यामुळे त्यांच्याविषयी हर्ष-विषाद न मानता ज्ञानी पुरुष सर्व आनंदाने सहन करतो.  तो कोणालाही दोष देत नाही किंवा तक्रार करीत नाही.
प्रारब्धवशात् शरीर प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे सर्व चांगले वाईट प्रसंग, इष्ट-अनिष्ट सुखदुःखात्मक प्रसंग प्रारब्धाचेच फळ आहे.  त्यामुळे ते कोणालाही टाळता येत नाही, थांबविता येत नाही किंवा बदलता येत नाही.  हे त्रिवार सत्य आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष हे यथार्थपणे समजून ते आनंदाने उपभोगतो.  म्हणजेच तो हे शरीर प्रारब्धालाच अर्पण करतो.  त्यामुळे दुःखामध्ये उद्वेगरहित आणि सुखाच्या प्रसंगामध्ये स्पृहारहित असतो.
मिथ्यास्वरूपत्वात् आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आत्मा हाच सत्य आणि अन्य सर्व मिथ्या ही दृष्टि प्राप्त झाल्यामुळे देह आणि त्याचे कारण प्रारब्ध हे सुद्धा मिथ्या स्वरूपाचे पाहात असल्यामुळे मिथ्या बुद्धीने तो स्वीकार करतो.  ज्याप्रमाणे एखादा नट नाटकामध्ये विविध वेष धारण करून अनेक भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे हुबेहूब वठवितो.  लोकांना ते वेष सत्य वाटतात. नटाला मात्र निश्चितपणे तो कोण आहे याची जाणीव सतत असते.  यामुळेच जोपर्यंत वेष घेऊन भूमिका करीत आहे तोपर्यंत हा सर्व भास आहे हे जाणूनही तो त्या भूमिका करीत असतो.  भूमिकेच्या सुखदुःखांनी तो व्यथित होत नाही.

त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरुष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जणू काही नाटकातील नटाप्रमाणे जीवन जगतो.  प्रारब्धानुसार आपल्या देहाच्या तो सर्व भूमिका हुबेहूब वठवितो.  देहपातापर्यंत तो प्रारब्धाचे नाटक स्वेच्छेने आणि आनंदाने पाहातो. मात्र त्याला स्वस्वरूपाची सतत जाणीव असते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "Maneesha Panchakam
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

No comments:

Post a Comment