Tuesday, June 7, 2016

द्रौपदीच्या हाकेचा विलंब | Delay in Draupadi’s Call


महाभारतामधील द्रौपदीवस्त्रहरणाचा प्रसंग आपणा सर्वांना माहीत आहे.  तो प्रसंग घडून गेल्यानंतर द्रौपदी व भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद आहे.  द्रौपदी भगवंताला प्रश्न विचारते की, भगवंता !  तू माझा पाठीराखा असताना माझ्यावर इतका अपमानास्पद प्रसंग खरे तर येताच कामा नये.  तू स्वतःला भक्तरक्षक म्हणवितोस. परंतु तू त्यादिवशी राजसभेमध्ये येण्यास खूप उशीर लावलास.

यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात की, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.  परंतु तू ती घटना नीट आठव.  भर सभेमध्ये तुझी विटंबना होत होती, दुर्योधन अत्यंत घृणास्पद शब्दांनी तुझी अवहेलना करीत होता.  दुःशासनाने ज्यावेळी तुझ्या वस्त्रास हात लावला, त्यावेळी तू लज्जारक्षणार्थ त्या सभेमधील राजा धृतराष्ट्र, गुरु द्रोणाचार्य, कुलगुरू कृपाचार्य, पितामह भीष्माचार्य या सर्वांना प्रार्थना केलीस.  त्यानंतर तू तुझ्या पराक्रमी पाच पतींच्याकडे धाव घेतलीस. परंतु तुझी निराशा झाली.

नंतर तू स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केलास.  परंतु ते तुला शक्य झाले नाही.  तू असह्य अगतिक झालीस.  त्याचवेळी तुला माझे तीव्रतेने स्मरण झाले.  एका ईश्वराशिवाय आता माझे कोणीही रक्षण करू शकत नाही, याची तुला जाणीव झाली व त्याक्षणी तू मला आर्ततेने ‘गोविंद’ अशी हाक मारलीस.  मी तुझ्या रक्षणाला हजर झालो.  म्हणून हे द्रौपदी, मी उशीर लावला नसून तूच मला हाक मारण्यास विलंब केलास !

ज्यावेळी साधकाच्या जीवनामध्ये ईश्वराव्यतिरिक्त अन्य सर्व आश्रयांचा त्याग होतो, त्यावेळी तिला अनन्य, अव्यभिचारिणी भक्ति असे म्हणतात.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ

No comments:

Post a Comment