Tuesday, April 26, 2016

आत्मज्ञान आणि सिद्धि | Self-Realization & Supernatural Powers


ज्ञानी पुरुषाचा संकल्प हा अत्यंत शुद्ध असतो.  शास्त्रकार सुंदर दृष्टांत देतात – दोरखंडाला असणाऱ्या घट्ट पिळ्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाच्या कामना आहेत.  परंतु तोच दोरखंड जाळला तर जाळल्यानंतर सुद्धा पीळ दिसतात.  परंतु त्या पिळ्यांच्यामध्ये काहीही तथ्य राहत नाही.  त्याचप्रमाणे, ज्ञानी पुरुषाच्या कामना वर वर जरी दिसल्या, तरी त्या केवळ संकल्पमात्र आहेत.  त्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व, कामुकता, स्वार्थ, भोगवृत्ति यांचा अत्यंत अभाव आहे.  त्या कामना केवळ स्वतःसाठी नसून अन्य लोकांच्यासाठी, लोककल्याणासाठी आहेत.

त्याचे मन अत्यंत शुद्ध झालेले आहे.  पूर्ण शुद्ध अंतःकरण हे हिरण्यगर्भाचे लक्षण आहे.  हिरण्यगर्भ म्हणजेच समष्टि अंतःकरण होय.  म्हणून अंतःकरण अत्यंत शुद्ध होणे, म्हणजेच हिरण्यगर्भावस्था प्राप्त होणे होय.  त्याचे अंतःकरण समष्टि अंतःकरणाशी एकरूप होते.  म्हणूनच त्याने संकल्प करावा आणि तो पूर्ण व्हावा.  त्याला सर्व प्रकारच्या अणिमादि सिद्धि, वाक् सिद्धि, संकल्पसिद्धि प्राप्त होतात.  म्हणूनच तो – सत्यसंकल्पवान् भवति |

ज्ञानी पुरुष या सिद्धींचा उपयोग स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी करतो.  म्हणून ज्या जीवांना ऐश्वर्याची, धन-धान्य-पुत्र-पौत्रादि ऐहिक कामना, तसेच स्वर्गादि कामना असतील, तर त्यांनी आत्मज्ञानी पुरुषाचीच पूजा करावी.  पादप्रक्षालन, पाद्यपूजा करावी.  शुश्रुषा म्हणजेच त्याची सेवा करावी.  त्याला अनन्य भावाने नतमस्तक व्हावे, कारण या संपूर्ण विश्वामध्ये आत्मज्ञानी पुरूषच सर्वश्रेष्ठ असून पूजनीय व वंदनीय आहे.

आत्मज्ञानी पुरुषाला जरी सर्व सिद्धि असतील, तरी सर्वच ज्ञानी पुरुष या सिद्धींचा उपयोग करीत नाहीत.  काही पुरुष हिरण्यगर्भावस्था प्राप्त केल्यानंतर दुर्दैवाने सिद्धींच्या आकार्षणामध्ये, प्रसिद्धीमध्ये, ऐश्वर्यामध्येच बद्ध होतात.  परंतु खरा ज्ञानी पुरुष कधीही सिद्धींच्या आकर्षणाला बळी पडत नाही.



- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment