Tuesday, April 5, 2016

अज्ञानी जीवांचे जीवन चरित्र | Biography of Ignorant Beings



अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |
जङ्घन्यमानाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथाsन्धाः || (मुण्ड. उप. १-२-८)   
जोपर्यंत आपण अंधारामध्ये राहतो, अंधारामध्येच रममाण होतो, त्यावेळी आपली बुद्धि त्या अंधाराने आवृत्त होते. आपण आपल्याच मनाच्या कल्पनाविलासमध्ये जोपर्यंत जगतो, त्याच्या बाहेर येता येत नाही, तोपर्यंत कधीही मनुष्याची प्रगति होऊ शकत नाही.

याठिकाणी भाष्यकार विचारप्रवृत्त करतात – “ पशुपक्षी सुद्धा जगतात. कुत्री सुद्धा जन्माला येते, पिलावळ जन्माला घालते आणि मारून जाते.  मग मनुष्य आणि पशू यात फरक काय ?  राहणीमान, जीवनमान यामध्ये थोडाफार बदल असेल, परंतु अर्थ आणि कामाने प्ररित होऊन, हजारो, लाखो कामना निर्माण करून त्या पूर्ण करणे, त्याच्यासाठी एक नव्हे, हजारो-लाखो जन्म व्यर्थ घालविणे, हे खरोखरच योग्य आहे का ? ”  हा विचारही मनुष्याच्या मनाला शिवत नाही.  जसे, बैल घाण्याला जुंपल्यानंतर त्याला फिरत राहणे एवढेच माहीत आहे.  त्याच्या जीवनाला कोणतेही साध्य नाही, दिशा नाही.

तसेच आपण फक्त परिभ्रमण करतोय.  एक जन्म नव्हे, जन्मानुजन्मे सकाळी उठायचे, नंतर दिवसातून आठ-बारा-आठ वाजता खायचे, काहीतरी काहीतरी व्यर्थ वेळ घालवायचा, विषय आणि भोग यांचे वैषयिक जीवन जगायचे आणि दिवस मावळला की झोपायचे.  पुन्हा दुसऱ्या दिवशी उठायचे.  आचार्य वर्णन करतात -
बालस्तावत् क्रिडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः |
वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोsपि न सक्तः ||  (भज गोविन्दम्)  
लहान मूल खेळामध्ये, तरुण युवक इंद्रियभोगांच्यामध्ये आणि वृद्ध लोक चिंतेमाध्येच रममाण होतात.  परंतु कोणीही परब्रह्मस्वरूपामध्ये आसक्त होत नाही.  हेच आपले जीवन चरित्र आहे.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ

No comments:

Post a Comment