Tuesday, April 12, 2016

ब्रह्मविद्येची परंपरा | Transition of Supreme Knowledge


जी विद्या ब्रह्माजीकडून अथर्वाकडे आली, ती विद्या अङ्गिराला देत असताना अथर्वाने जी विद्या घेतली होती, तीच विद्या आपल्या शिष्याला प्रदान केली.  म्हणजेच ब्रह्मविद्येमध्ये आपले स्वतःचे मत, स्वतःच्या कल्पना, स्वतःचे ज्ञान, स्वतःचे राग आणि द्वेष, बुद्धीच्या मर्यादा येऊ शकत नाहीत.  नाहीतर गुरूंनी शिकविले एक आणि आपण दुसऱ्यांना शिकवीत असताना जर स्वतःच्या कल्पना, स्वतःची मते सांगितली तर ते ज्ञान यथार्थ होऊ शकत नाही.

म्हणून या संप्रदायामध्ये सर्वांनीच अध्ययन केले, तरी सर्वचजण ही विद्या दुसऱ्याला प्रदान करू शकत नाहीत.  जी विद्या घेतली आहे, ती तशीच्या तशी म्हणजेच त्या विद्येमध्ये स्वतःची भर न घालता किंवा जे ज्ञान घेतले आहे, त्यामधील काहीही न वगळता प्रदान करणे आवश्यक आहे.  मला जेवढे आवडले, तेवढेच सांगणे आणि जे पटले नाही, समजले नाही, तो भाग गाळणे हा फार मोठा दोष आहे.

व्यवहारामध्ये आपले ज्ञान दुसऱ्याला दिले तर माझे महत्त्व कमी होईल, अशी भीति वाटते.  म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वजण माहितीवजा ज्ञान देतात, परंतु रहस्य मात्र स्वतःजवळ राखून ठेवतात.  आपले ज्ञान दुसऱ्याला सहजासहजी देत नाहीत.  ब्रह्मविद्या मात्र जेवढी गुरूंच्याकडून घेतली, तेवढी पूर्णतः आपल्या शिष्याला प्रदान केली जाते. हेच खरे ज्ञान होय.

ब्रह्मविद्येमध्ये कधीही तडजोड करता येत नाही.  जशी घेतली आहे, तशीच संपूर्ण विद्या दिली पाहिजे. म्हणून विद्या कधी हातची राखून देता येत नाही.  ज्या वेळी मी माझ्या गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त करेन, ते स्वतःजवळच न ठेवता, दुसऱ्यांना प्रदान करावे की, ज्यामुळे हा संप्रदाय, ही परंपरा अखंडपणाने चालू राहू शकेल.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment