Friday, March 27, 2015

संसाराचा निरास का करावा ? | Why to Ward-off Illusion?


संसाराचा निरास का बरे करावा ?  याचे कारण सांगतात की, संसार हा – दुःखस्वरूपत्वात् | संसार दुःखस्वरूप, अत्यंत दुःख देणारा असल्यामुळे संसाराचा निरास करणेच योग्य आहे.  नदीचा प्रवाह जसा अखंड चाललेला आहे, नित्य अव्याहतपणाने नदी सतत वाहत राहते, तसाच हा संसार जन्मानुजन्मांच्यापासून अखंडपणाने प्रवाहीत आहे.  म्हणून आपला संसार फक्त या शरीरापुरताच मर्यादित नाही, तर एका मृत्युपासून दुसऱ्या मृत्यूकडे प्रवाहीत होतो. याप्रमाणे संसाराला नित्यप्रवाहीत्व आहे.

आज जो संसार, यातना, दुःख, नैराश्य, वैफल्य मी अनुभवतो, तेच कमीजास्त फरकाने उद्या-परवा-जीवनभर अनुभवतो.  यालाच ‘नित्य प्रवाहीतता’ असे म्हणतात.  हे संसार चक्र अविद्येच्या शक्तीमुळे सुव्यवस्थित चालू आहे.  अविद्येचा इतका प्रचंड प्रभाव आहे की, संसार एक जन्म नव्हे, जन्मानुजन्मे अनादि काळापासून अखंडपणे चालू आहे.  अविद्येमधून कर्तृत्व, भोक्तृत्व, त्यामधून कर्म आणि कर्मामधून कर्मफळ आणि त्यामधून सुखदुःखात्मक असणारा हा सर्व संसार निर्माण होतो.  संसारामध्ये अजिबात खंड पडत नाही.  बाकी सर्व ठिकाणी खंड पडेल.  अभ्यास, साधना, उपासना यामध्ये खंड पडेल.  परंतु, संसार मात्र अखंड, अव्याहतपणे चालू आहे.

या संसाराचे स्वरूपच दुःख आहे.  म्हणून कितीही संसार तुम्ही करा, त्यामधून तुम्हाला कधीही शुद्ध, निर्भेळ आनंद मिळू शकत नाही.  जसे, कोळसा कितीही उगाळला, तरी काळा तो काळाच राहतो.  तसेच हा संसार तुम्ही कितीही ठीकठाक करण्याचा प्रयत्न करा, कितीही यथार्थ करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही जितका कराल तितका तो संसार तुम्हाला आनंदवर्धन न करता, तो संसार दुःख, यातना, नैराश्य, वैफल्य, जन्म, मृत्यू यालाच कारण होतो.  सुख आल्यासारखे वाटते, परंतु नियती एकामागे एक असे आघात करते की, हा जीव पुन्हा या सर्व दुःखांनी बद्ध होतो.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment