Sunday, February 8, 2015

विज्ञानयुगात वेद का ? | Why Vedas in Scientific Age ?




सद्य समाजामधील फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या प्राचीन वेदपरंपरा नष्ट होत आहेत.  पूर्वीच्या काळी माणसे एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने जोडलेली होती.  परस्परांच्यामध्ये मतभेद, रागद्वेष, स्वार्थ वगैरेदि वृत्ति असतील तरीही मनुष्यावर वैदिक संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे आचारविचारांचे अत्युत्तम संस्कार हा माणसामाणसातील दुवा होता.  त्यामुळे अनेक दुःखे असतील तरी जीवन सुसह्य होते.

याउलट, जसजसे विज्ञानाचे अत्याधुनिक शोध लागले, दळणवळणाची साधने अतिशय गतिमान झाली, मनुष्याच्या संपर्काची साधने वाढली, तसतसे उलट मनुष्य एकमेकांच्यापासून दूर जावू लागला.  सध्या तर मोबाईल फोनमुळे माणसे व्यवहारिक दृष्टीने अतिशय जवळ आली असतील तरी मानाने मात्र फार दूर गेली आहेत.  या सर्व सोयींच्या नावाखाली माणुसकी हरविली गेली. वैदिक संस्कृतीचा, अतिशय लोकोपकारक असणाऱ्या जीवनमूल्यांचाच ऱ्हास झाला.  मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |  अतिथिदेवो भव |  ही विधाने फक्त सर्वांच्या पुस्तकात व प्रवचनातच अडकून राहिली.

आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने मनुष्याच्या बहिरंग समस्या जरी सुटल्या तरी अनेक अंतरंग समस्यांची तीव्रता वाढून जीवन असह्य झालेले आहे.  माणूस व माणुसकी माणसालाच पारखी झाली आहे.  म्हणूनच आज समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.  तरुणांच्यामध्ये, कुटुंबांमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, वृद्धांच्यामध्ये रोज नवनवीन समस्या निर्माण होत आहेत.


सर्व समस्या मुळापासून संपवायच्या असतील तर आधुनिक विज्ञानयुगातील मानवाला पुन्हा एकदा वैदिक संस्कृतीची पाने उलगडावी लागतील.  त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.  म्हणून वेद हे विज्ञानयुगात तथाकथित विद्वानांच्या मतानुसार कालबाह्य झालेले नाहीत तर वैदिक ज्ञान ही विज्ञानयुगाची गरज आहे.


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011


- हरी ॐ





No comments:

Post a Comment