Saturday, February 14, 2015

भिक्षा आणि ब्रह्मविद्या | Alms and Supreme Knowledge


ब्रह्मविद्या म्हणजे केवळ पुस्तकी, शाब्दिक ज्ञान नव्हे, तर जी ब्रह्मविद्या सर्वसंगपरित्याग करून घेतली जाते, तीच मोक्षाला साधन आहे.  कर्माच्या बरोबर कधीही ही विद्या प्राप्त करता येत नाही.  तर जे जिज्ञासु, मुमुक्षु साधक भिक्षेचे आचरण करतात, त्यांनाच ब्रह्मविद्या प्राप्त होते.

मग कोणी म्हणेल की, भिक्षा मागणे आणि ब्रह्मविद्या यांचा काय संबंध आहे ?  याठिकाणी आचार्य – भैक्ष्यचर्यां चरन्तः |  असा शब्द वापरतात.  हे ज्ञान केवळ बुद्धीने नाही, केवळ विवेकाने किंवा केवळ वैराग्याने आत्मसात होत नाही तर त्यासाठी मनाची प्रचंड मोठी तयारी आवश्यक आहे.  यासाठीच शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या जातात.  त्यामध्ये ‘भिक्षावृत्ति’ ही अत्यंत आवश्यक साधना आहे.  भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणे नव्हे, तर भिक्षा ही अंतःकरणाची एक वृत्ति आहे.  भिक्षा हे एक व्रत आहे.

भिक्षा मागत असताना दुसऱ्यावर चिडू नये.  ज्याच्याकडून भिक्षा घेतो, त्याला यत्किंचित सुद्धा क्लेश, यातना देऊ नयेत.  भिक्षा मागण्यासाठी दुर्जनांच्या घरी जाऊ नये.  स्वतःला अतिक्लेश न देता म्हणजे चमचमीत मिळविण्यासाठी जास्त न हिंडता, जे काही मिळेल, ते थोडेसे जरी मिळाले तरी त्याच्यामध्ये संतुष्ट व्हावे.  यला ‘भिक्षा’ असे म्हणतात.  दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून – ‘ॐ भवति भिक्षां देहि |’  असे म्हणून भिक्षा मागणे ही इतकी सोपी गोष्ट नाही.  त्यासाठी साधकाचा अहंकार नम्र व्हावा लागतो.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment