Thursday, September 25, 2014

कर्मशून्यतेचे परिणाम | Results of Inaction


जिज्ञासु साधकाने शास्त्रप्रमाणानुसार आपापल्या अधिकाराप्रमाणे श्रौतस्मार्तादि कर्मे करावीत, असा आदेश देताना त्याचवेळी भगवान सांगतात – कर्म ज्यायो ह्यकर्मणः |  कर्म न करण्यापेक्षा किंवा कर्मशून्यतेपेक्षा कर्म करणे हे निश्चितच श्रेयस्कर, कल्याणकारक आहे.

कर्म न करण्यामुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात.
१) स्वकर्तव्य न करण्यामुळे प्रत्यवाय दोष निर्माण होतो.
२) शरीरामध्ये तमोगुण प्रबल होवून जडत्व वाढते.

तसेच, अंतःकरणामध्येही तमोगुणवृत्तीचा उत्कर्ष होवून आलस्य, निद्रा, प्रमाद, निष्काळजीपणा, कर्म न करण्याची वृत्ति निर्माण होते. इतकेच नव्हे तर, अंतरिक सावधानता आणि एकाग्रता नाहीशी होते. मन अत्यंत सुंद होते आणि तामोगुण जितका वाढतो तितक्या प्रमाणात विवेक-वैराग्य-शमदमादिषट्संपत्ति किंवा सत्त्वगुण तसेच, मनाची सूक्ष्मता, ग्रहणशक्ति नाहीशी होते आणि मन अधःपतित होते. तसेच, रागद्वेषादि विकारांचा उत्कर्ष होतो.  

यामुळे मनुष्य परमपुरुषार्थापासून च्युत होतो. शरीरपातानंतरही त्याला सुखप्राप्ति होत नाही. उलट, अनेक प्रकारच्या प्रत्यवाय दोषांच्यामुळे आणि तमोगुणाच्या प्राबल्यामुळे नरकप्राप्ति आणि अधोयोनिप्राप्त होते. स्वधर्म व स्वकर्तव्यापासून मनुष्य च्युत होवून अधर्माचरणामध्ये प्रवृत्त होतो. असे कर्म चित्तशुद्धीचे साधन होणार नाही.

म्हणून असे कर्म करावे की, ज्यामुळे अहंकार, रागद्वेष, स्वार्थ, लोभ वगैरेदि दोष हळुहळू कमी होतील आणि मन शुद्ध व निर्मळ होवून सत्त्वगुणप्रधान होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment