Tuesday, February 18, 2014

भगवान कृष्ण – पालनकर्ता | Lord Krishna – The Guardian



आदि शंकराचार्य षट्पदी स्तोत्रात म्हणतात ‘ हे परमेश्वरा !  मत्स्य, कूर्म, वराह वगैरेदि अनेक अवतार धारण करून तू नित्य पृथ्वीचे रक्षण केलेस.  भगवंता !  तू याप्रमाणेच माझेही रक्षण करावेस, कारण मी संसारतापाने भयभीत झालो आहे. ’  

प्रत्येक जीव संसाराच्या त्रिविध तापामध्ये होरपळून निघतो.  आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचे असह्य रोग, यातना होय.  आधिभौतिक ताप म्हणजे सभोवतालची माणसे, आप्त, सगेसोयरे, बंधुबांधव, नातेवाईक यांच्यापासून प्राप्त होणारे दुःख होय.  तसेच, अतिवृष्टि, अनावृष्टि, भूकंप, ज्वालामुखी वगैरे नैसर्गिक आपत्ति म्हणजे आधिदैविक ताप होय.  याप्रकारच्या अनंत दुःखांनी मनुष्य सर्व बाजूंनी हतबल होतो.  त्याचे मन अस्वस्थ, उद्विग्न होते.  जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यामुळे मनुष्य अतिशय भयभीत होतो.

ज्याप्रमाणे लहान मूल घाबरले की, आईवडील त्वरित त्याचे रक्षण करतात.  त्यावेळी आईवडील मुलाकडून कोणतीही अपेक्षा करीत नाहीत.  म्हणूनच आईवडिलांना ‘ पालक ’ असे म्हटले जाते.  म्हणून येथे आचार्य भगवंतालाच प्रार्थना करतात की, ‘ भगवंता !  तूच माझी आई–वडील, बहिण– बंधु, सखा सर्वकाही आहेस.  त्यामुळे मी कसा आहे ?  माझ्यामध्ये किती गुणदोष आहेत ?  किंवा मी तुला शरण आलो आहे की नाही ?  हे काहीही न पाहता तू माझे या भवतापापासून रक्षण करावेस.  परमेश्वरा, हेच तर तुझ्या अवताराचे प्रयोजन आहे.

‘ अवतार ’ म्हणजे खाली येणे होय. भगवंता !  माझ्या उद्धारासाठीच तर तू खाली आलास.  निर्गुणाचा सगुण झालास.  जसे मूल खड्ड्यात पडल्यानंतर आईवडील स्वतः खड्ड्यात उतरून, खाली जाऊन त्याला बाहेर काढतात.  म्हणूनच भगवंता, तू माझा मायबाप आहेस.  आमच्यासारख्या पातकांच्या राशी असणाऱ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी तू या पृथ्वीतलावर अनेक अवतार धारण केलेस.

 
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013



- हरी ॐ

No comments:

Post a Comment